Breaking

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

महाड म्हाप्रळ पंढरपूर मार्गाचे काम संथ गतीनेगेली वर्षभरापासून काम ठप्प - प्रवाशांसह वाहनचालक त्रस्तमहाड: मिलिंद माने



महाड म्हाप्रळ पंढरपूर मार्गाचे काम संथ गतीने
गेली वर्षभरापासून काम ठप्प - प्रवाशांसह वाहनचालक त्रस्त

महाड: मिलिंद माने


महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ पंढरपूर या मार्गाचे रुंदीकरण काम सुरु असून गेली एक वर्ष हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, महाप्रळ पर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून ये जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत.

म्हाप्रळ पंढरपूर हा राज्यमार्ग १५ महाड जवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठी पासून सुरवात होवून तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरूस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा रस्ता महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. यामुळे हा मार्ग ९६५ डी.डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. सदर मार्ग हा ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी देखील या मार्गाने जाता येते. शिवाय या भागातील वारकऱ्यांचा पालखी मार्ग देखील आहे. यामुळे आषाढी, कार्तिकीला या मार्गाने पालखी देखील जात असते. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षापूर्वी सुरवात केली होती. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने सदर ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड महाप्रळ पंढरपूर मार्गाचे काम देखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. त्यानंतर अन्य एका एजन्सीने ही काम घेतले मात्र त्यांनी देखील प्रत्यक्ष सुरवात केली नाही. मुळ ठेकेदार सब ठेकेदार नेमत असल्याने या रस्त्यांची कामे रखडत चालली आहेत.  या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प आहे. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत. तालुक्यातील शिरगाव, पासून पुढे कांही प्रमाणात रस्ता बरा आहे मात्र सव गावापासून पुढे कोणता खड्डा चुकवायचा असा प्रश्न वाहन चालकापुढे पडत आहे.

रत्नागीरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागीरी जिल्हयातील सिमेवरील गावांचा अधिक संबध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण, आरोग्य आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणाऱ्या एस.टी.च्या गाडया देखील या परीसरातून ये जा करत असतात. या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, महाप्रळ आदी गावे येतात. या परीसरातील नागरीकांचा थेट संबध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानक देखील आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे राजेंद्र पाटणे यांनी सांगितले. या मार्गाच्या कामासाठी प्राधान्याने सुरवात केली जावी अशी मागणी जोर धरत आहे.  

महाड पासून महाप्रळ पर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. जागोजागी खड्डे आणि केलेले खोदकाम यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे – सुनील जाधव सामाजिक कार्यकर्ते, गोठे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा