*202 कोटींची पाणीपूरवठा व 180 कोटींची भूयारी गटार योजना ;
अकलूज नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचे सादरीकरण*
अकलूज : अकलूज-माळेवाडी नगरपरिषदेच्या स्थापनेला केवळ एक वर्ष पूर्ण होत असतानाच सुमारे 202 कोटींचा पाणीपुरवठा व 180 कोटींचा भूयारी गटार योजनेचा विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्याचे सादरीकरण आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल करण्यात आले.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृह येथे करण्यात आलेल्या सादरीकरणासाठी आ.राम सातपुते, माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील, माजी उपसरपंच धनंजय देशमुख, माजी सदस्य क्रांतीसिंह माने-पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्यासह माजी सदस्य व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, स.म.कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, सोलापूर जिल्हा भाजपाचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी स्वत: लक्ष घालून पुढील 30 वर्षांची अकलूजची लोकसंख्या विचारात घेऊन अकलूज-माळेवाडीच्या नागरीकांना सोयी-सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून पाणीपुरवठा, भूयारी गटार योजनेचा विकास आराखडात तयार करून घेतला आहे.
या विकास आराखड्यात 77 मैल येथे जॅकवेल व पंप हाऊस बांधून 660 मीटर पर्यंत 700 मी.मी. डायमीटर पाईपने पंपहाऊस पर्यंत 9 लाख लिटर उंच संतुलन टाकी 400 एच.पी. पपने परून त्या टाकी पासून 9 कि.मी. 800 मी.मी. डायमीटर पाईप मधुन विझोरी तलाव भरावयाचा आहे. विझोरी तलाव सद्यस्थितीत 280 मिलियन लिटरचा असून विकास आराखड्यामध्ये तो मध्ये 943 मिलियन लिटरचा करण्यात आला आहे. त्याचे विस्तारीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे. विझोरी येथे सद्यस्थितीत 8 एम.एल.डि चा फिल्टर प्लॅन्ट व नवीन 9.50 एम.एल.डि फिल्टर प्लॅन्ट बांधून विझोरी येथे नवीन 9 लाख लिटर मुख्य संतुलन टाकी बांधून त्या मधुन व राजहंस येथील जुन्या मुख्य संतुलन टाकी मधुन जुन्या 14 पाण्याच्या टाक्या व नवीन 6 पाण्याच्या टाक्या भरण्यात येणार आहेत. मुख्य संतुलन टाक्या भरण्यासाठी 25 कि.मी. पाईप लाईन करण्यात येणार आहे. अकलूज शहरात नवीन वितरण व्यवस्था करण्यासाठी सुमारे 151 कि.मी. पाईप लाईन करण्यात येणार आहे. नवीन सहा टाक्या बांधण्याची ठिकाणे जिजामाता कन्या प्रशाला, महावीर पथ, राऊतनगर, पंचवटी, विद्यानगर (माळेवाडी) सयाजीराजे (माळेवाडी) हि निश्तित करण्यात आली आहेत. या योजनेसाठी अंदाजे सुमारे 202 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.
तसेच भूयारी गटार योजनेसाठी पुढील 30 वर्षानंतरची 102589 एवढी लोकसंख्या विचारात घेता पहिल्या टप्प्यात 78 किलोमीटरची तर दुसर्या टप्प्यात 55 किलोमीटरची भूयारी गटार करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये 3405 चेंबर तर दुसर्या टप्प्यांत 2209 चेंबरची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी दोन पंपींग स्टेशन उभारण्यात येणार असून पहिले पंपींग स्टेशन 80 एचपीचे विकासनगर येथे तर दुसरे पंपींग स्टेशन 175 एच.पीचे शिवसृष्टी किल्ल्यामागे करण्याचे प्रस्तावित आहे. मलनिस्सारण दाब वहिनी 600 मिली मिटर आणि 400 मिली मिटर ची असून त्याची लांबी 3.3 किलोमिटर असणार आहे तर मलजल शुध्दिरकरण केंद्र प्रति दिवस 12 दशलक्ष घन मिटर ऐवढ्या क्षमतेचे असणार आहे. या योजनेचा अंदाजे खर्च 180 कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
सदरच्या विकास आराखड्याचे सादरीकरण निसर्ग कन्सलटन्सी नाशिक चे एस.बी.पाटील व दिनेश गावीत यांनी केले. यावेळी महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे उपअभियंता के.आय.स्वामी, शाखा अभियंता डी.जी.माने, विज महावितरणचे उपअभियंता पाटील, अतिरिक्त उपअभियंता कोकरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा