Breaking

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

सोलापूर जिल्ह्यात अवकाळीपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी...... आमदार बबनदादा शिंदे यांची मागणी.. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा ,डाळिंब या पिकांना अवकाळीचा मोठा फटका ....



सोलापूर जिल्ह्यात अवकाळीपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी......


    आमदार बबनदादा शिंदे यांची मागणी
.. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा ,डाळिंब या पिकांना अवकाळीचा मोठा फटका ....

बेंबळे प्रतिनिधी           आ.बबनदादा शिंदे 
                                         फोटो

          पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात हजारो एकर द्राक्ष, कांदा ,डाळिंब व इतर पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांनी पालकमंत्री दत्तामामा भरणे व तसेच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली असून या नुकसानभरपाई पंचनामे बाबत  तातडीने प्रक्रिया राबवण्यात  यावी अशीही मागणी केली आहे. याच प्रमाणे आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनालाही पत्राद्वारे साकडे घातले आहे की  पुणे, सांगली,नागपूर, नाशिक भाग अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या अवकाळी नुकसानीचे पंचनामे होत आहेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही मिळण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील शेकडो एकर द्राक्ष, कांदा आदी पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न व्हावेत .
                  अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे पुढे म्हणाले की 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेर पर्यंत द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागांची छाटणी केलेले असते. या द्राक्षाच्या बागामधे नोव्हेंबर अखेरपर्यंत फुलोरा ला आलेले होता , अनेक वेलीवर द्राक्षाचे मणी तयार होऊ लागले  होते, परंतु 29 व 30 नोव्हेंबर व तसेच एक दोन आणि तीन डिसेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या सर्व  बागांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पावसामुळे वेलीवरील घड व त्यातील द्राक्षाचे मणी नासून गेले आहेत . याचप्रमाणे हजारो एकर क्षेत्रावरील कांदा पिक अवकाळी पावसामुळे नासून गेल्यामुळे नुकसान झाले आहे. याच बरोबर डाळिंब केळी पेरू लिंबू चिकू आदी फळबागा व रब्बी हंगामातील ज्वारी मका गहू व चारा वैरणीच्या पिकांचेही  नुकसान झालेले जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. 
                    फळबागांना पोसण्यासाठी लाखो रुपयाच्या औषधाची फवारणी करावी लागते. तसेच इतर पिकांच्या  मेहनत मशागतीसाठी व बी बियाणे आणि रासायनिक खतासाठी हजारो रुपये खर्च झालेला आहे, अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ,त्यामुळे या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी रास्त मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.  महसूल विभाग ,कृषी विभाग व इतर संबंधित वरीष्ठ  अधिकार्यांनी या बाबतीत त्वरित हालचाली कराव्यात  अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

चौकट ....
     जिल्हा कृषी विभागामार्फत नुकसान भरपाई  संदर्भातील नजर अंदाज प्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर झाल्यानंतर याबाबतीत निर्णय घेण्यात येतो...
 वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर

चौकट....
 नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन या सदराखाली जिल्हाधिकाऱ्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात शासनाकडून परिपत्रक मागवलेले आहे, त्यानुसार काय निर्णय घ्यायचा हे महसूल विभागाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी  घेतील.
 बाळासाहेब शिंदे ,जिल्हा कृषी अधिकारी  , सोलापूर 

चौकट....
 प्रत्येक तहसील कार्यालय ठिकाणी कृषी विभागातर्फे' महारेन' यंत्रणेद्वारे कोणत्या विभागात किती पाऊस झाला व किती मिलिमीटर पाऊस झाला याचा अहवाल उपलब्ध  होत असतो. 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी होऊन शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल त्या ठिकाणचे पंचनामे करावे असा आदेश आहे. त्या नियमानुसार  माढा तालुक्यात फक्त एकाच  गावातील पंचनामे करण्याचे आदेश आहेत.
      राजेश चव्हाण, तहसीलदार, माढा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा