15 जानेवारी नंतर रब्बीसाठी आवर्तन सोडण्याचा विचार होणार...
.. धरणातील पाणीसाठ्यात तीन टीएमसी ने वाढ... ...पाणी पातळीत सहा टक्क्यांनी वाढ....
...अवकाळी पावसामुळे औंज व चिंचपूर बंधारे भरले...नदीतून आवर्तनाची बचत
बेंबळे। प्रतिनिधी।
29- 30 नोव्हेंबर व 1--2 डिसेंबर रोजी पुणे व सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळीत सध्या सहा टक्के वाढ झालेली असून एकूण तीन टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे .तसेच सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी परिसरातील क्षेत्रात अशाचप्रकारे झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज व चिंचपूर बंधारे सध्या नदीतील पाण्यामुळेच पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामुळे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या आवर्तनाची मोठी बचत झालेली आहे. दरम्यान सध्या तरी खरिपासाठी पाण्याची मागणी होत नसल्यामुळे व नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांना पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता नसल्यामुळे उजनी धरणातून कालवा, बोगदा व नदीतून शेतीसाठी रब्बीचे आवर्तन 15 जानेवारी 22 नंतर सुरू करण्याचा विचार, कालवा पाणी वाटप मंडळाच्या बैठकीत होईल, अशी माहिती जलसंपदा विभाग सोलापूर अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली आहे.
चौकट....
नोहोंबर- डिसेंबरमध्ये धरण परिसर व पुणे जिल्ह्यात पाऊस पडून उजनी धरणाच्या पाण्यात वाढ होणे व सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन रब्बीसाठी पहिल्या आवर्तनातील पाणी मागणीची गरज नसणे हे मागील पस्तीस --चाळीस वर्षाच्या इतीहासातील पहिलेच उदाहरण म्हणावे लागेल.
चौकट...
पावसाळा संपून दोन महिने झाले असून साधारण तिसऱ्या महिन्यात सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज व चिचपुर बंधाऱ्यातील पाणी कमी होऊ लागते व शहराला पाणी कमी पडू नये म्हणून उजनीतून भीमा नदीत किमान साडेचार ते पाच टीएमसी पाणी सोडावे लागते. पण सध्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भीमा नदीतील पाण्याने औंज व चिंचपूर व त्याच्या वरील बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. हे देखील अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच घडून आलेले नाविन्य म्हणावे लागेल.
एकंदरीत या सद्यस्थितीमुळे सन २०२२ च्या उन्हाळ्यात व पुढे पावसाळ्यातील एक ते दीड महिने, उजनी धरणातून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी सोलापूर जिल्ह्याला निश्चित पाणी कमी पडणार नाही असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा