Breaking

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

पाऊस पाण्याने चिंताग्रस्त असलेल्या बेंबळे येथे साधेपणाने दोन दिवसीय पोळा साजरा ...


पाऊस पाण्याने चिंताग्रस्त असलेल्या बेंबळे येथे साधेपणाने दोन दिवसीय पोळा साजरा ...



 बेंबळे। प्रतिनिधी।  मुकुंद रामदासी 


       चालू पावसाळ्याच्या तीन महिन्यात अद्याप पर्यंत समाधानकारक पाऊस नाही,उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, नदी, कालव्यातून चार महिने झाले पाणी नाही ,नगदी बागायती पिके, चारा वैरणीची पिके, फळबागा पाण्याअभावी जळून जाऊ लागल्या आहेत व सर्वत्र महागाईचे सावट आहे तरी पण बेंबळे परिसरात दोन दिवसीय बैलपोळा सण साधेपणाने साजरा करून बळीराजांने आपल्या बैला प्रति प्रेम, श्रद्धा व सहानुभूती व्यक्त केली. गुरुवारी श्रावणी अमावस्या दिवशी पोळ्यानिमित्त बैल, गाई, म्हशी यांना स्वच्छ धुवून रंग, हिंगुळ, बेगिड ,कंडे ,वेसण, म्होरक्या व चंगाळ्या घालून सजवण्यात आले व त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालण्यात आली, कांही युवा शेतकऱ्यांनी गावातून बैलांची मिरवणूक काढली. बेंबळे येथे पोळ्याच्या दुसरे दिवशी  'कटाळ्याचा पोळा'  साजरा केला जातो. येथील ग्रामदैवत श्री विमलेश्वराचा नंदी गावकऱ्यांनी 'कटाळ्या' म्हणून सांभाळला आहे व गावकऱ्यांची त्याचेवर अपार श्रद्धा आहे.शुक्रवारी त्याला स्वच्छ धुवून रंगीबेरंगी फुगे ,हिंगुळ , बेगीड, म्होरकी व कासरे लावून सजवून गुलालाची उधळण करीत शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गावातून  सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व त्याची आरती करण्यात आली. वेशीत आल्यानंतर प्रतिष्ठित बागायतदार दादामालक भगत यांच्या हस्ते कटाळ्यावरून नारळ ओवाळुन वेशीवर फोडण्यात आला. मिरवणुकीच्या वेळी रस्त्यात अनेक महिलांनी कटाळ्यास ओवाळून त्यास पुरणपोळी खाऊ घातली. पाऊस पडावा, धरण भरावे व पाण्याचे संकट दूर व्हावे अशी हजारो शेतकऱ्यांनी यावेळी श्रीमलेश्वर चरणी प्रार्थना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा