विठ्ठलगंगा फार्मर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषीमालाला निश्चितपणे चांगला दर मिळणार - आमदार बबनदादा शिंदे
विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचा भूमिपूजन समारंभ उत्साहात
*AJ 24 Taas News Maharashtra
माढा / प्रतिनिधी-राजेंद्र गुंड
- मागील अनेक वर्षांपासून शेतकरी कृषीमाल पारंपरिक साखळी पद्धतीने व्यापा-यांना विकतात त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे नव्याने उभारण्यात येत असलेल्या विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या फळांना व कृषीमालाला निश्चितच चांगला दर मिळेल असा आशावाद माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला.
ते निमगाव (टें)-दहिवली रोडच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी व अद्ययावत फुड प्रोसेसिंग युनिट आणि सुसज्ज पॅकिंग हाऊसच्या भूमीपूजन समारंभाप्रसंगी 16 नोव्हेंबर रोजी बोलत होते.
याप्रसंगी आमदार संजयमामा शिंदे, सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.ज्योत्स्ना शर्मा, पुणे विभागीय राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी. सोनकुंवर,महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष शिवाजी पवार,पलूसचे द्राक्षतज्ञ मारुती चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करताना विठ्ठलगंगाचे संस्थापक चेअरमन धनराज शिंदे यांनी शेतकरी उत्पादक संस्थेचे स्वरूप व कार्यपद्धतीच्या माहितीसोबत शेतकरी सभासदांना शेतीमाल लागवड, काढणी व निर्यात तसेच माती,पाणी, पान,देठ परीक्षण प्रयोगशाळा, उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटिका,कृषी औषधे,कृषीपयोगी साहित्य व शेतीमाल निर्यात या बाबींवर काम करणार असल्याने ही सभासदांसाठी नव्या क्रांतीची पहाट ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, सभासद शेतकऱ्यांनी या संस्थेवर विश्वास ठेवून परदेशात निर्यातीसाठी लागणारा उत्तम दर्जा व गुणवत्तेचा कृषीमाल उत्पादित करून त्यापासून जास्तीत जास्त आर्थिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले की,शेतकऱ्यांनी ऊस शेती बरोबर इतर फळबागा व नगदी पिकांच्या लागवडीकडे वळावे असे आवाहन करून या संस्थेमुळे मध्यस्थांची साखळी कमी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषीमालाला निश्चितपणे चांगला भाव मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला उपस्थित शेतकऱ्यांपैकी सुमारे 500 शेतकऱ्यांनी सभासद नोंदणी केली.हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सभासद नोंदणी लवकरच पूर्ण होईल.सभासदांना चांगली सेवा देण्यासाठी सभासद नोंदणी मर्यादित ठेवणार असल्याचे सांगून गरजू शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सभासद नोंदणी करून घेण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत पाटील,डॉ. पाटील,रवींद्र शिंदे,कृषीनिष्ठ नितीन कापसे,युवराज शिंदे,महेश मारकड,यशवंत भोसले, आनंद पानबुडे,सुजीत भोसले,महेश डोके,नागनाथ शिंदे,राहुल वरपे,राहुल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत कुंभार व रवींद्र जाधव यांनी केले.
फोटो ओळी - निमगांव (टें)-दहिवली ता.माढा रोडच्या बाजूला उभारण्यात येत असलेल्या विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे भूमीपूजन करताना आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व इतर मान्यवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा