*करमाळा तालुक्यात शालेय पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार*
*पोत्यामागे 5 ते 10 किलो तांदूळ, डाळी, व कडधान्याची तफावत*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
विद्यार्थ्यांना सकस आहार पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत ही बाब समोर असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे हे शोधून काढून खऱ्या आरोपींना बेड्या ठोकण्याची मागणी स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांनी केली आहे.याबाबत सदर प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले,की आम्ही सातोली,कंदर,जातेगाव, कामोणे या गावांमध्ये अचानक शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहाराची तपासणी केली असता तांदूळ एक गोणीमागे 5 ते 10 किलो,तर डाळी व मटकी यांच्या वजनात 3 ते 4 किलोची तफावत आढळून आली आहे. सर्व यंत्रणेच्या संगनमताने हा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ, तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे,तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, स्वाभिमानीचे नेते दीपक शिंदे उपस्थित होते.
या गैरव्यवहारात कोण कोण सहभागी आहे, याची चौकशी जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी. वितरण व्यवस्था सदोष आहेच परंतु शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फक्त तांदुळच देण्यात येतो डाळी तसेच मटकी व इतर साहित्य देण्यात येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या गंभीर घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा