*समाज क्रांती घडवून ४० वर्ष चंदना सारखे झिजलेल्या म.जोतिबा फुले यांची जयंती - सुनिल माने सर*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटावच्या, सातारच्या मातीला खऱ्या अर्थाने विश्व विराजमान करणारे, गांधींजींनी ज्यांना खरा महात्मा म्हटलं, त्या वंदनीय महात्म्यांच्या महात्म्यांचा जयंती दिन.
डॉ.आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक क्रांतिकारक म्हणून ज्यांचं जयगान केलं ते वंदनीय म. जोतिबा फुले. अनेकांना अनेक जन्म घेऊन करता येणार नाही ते म.फुलेंनी एका जन्मात करून दाखविले. सावित्री - जोती कार्य कर्तृत्वाने आभाळ उंचीची माणसं होती. महर्षी वि.रा.शिंदेंनी तर सत्याचा पालनवाला धन्य तो जोतिबा झाला असं महात्म्य सांगितलं.
तत्कालिन परिस्थितीत समाजाच्या अवहेलना, अनेक आपदा सहन करत स्वतःची पत्नी सावित्री व दोघांनी समाजक्रांती घडवून आणली. 'शिक्षण हे सर्वांगिण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे' असं शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या या युगपुरुषाने, क्रांतीसूर्याने स्त्री शिक्षण, अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढणे, बालहत्या प्रतिबंध गृह सुरु करणे तसेच केशवपन, बालविवाह,या अनिष्ट चालीरीतींना कडाडून विरोध करून समाज क्रांतीची मशाल तेवत ठेवली. कालचक्राला कलाटली देणारा, चारित्र्य चक्रवर्ती ज्ञानदेवाच्या पसायदाना एवढीच परममंगल अशी धर्म कल्पना म.फुलेंनी जगासमोर मांडली. जोतिबा ४० वर्षे चंदनासारखे झिजले. छ.राजांची रायगडावरील समाधिस्थान शोधून काढणारे, आपल्या कार्यप्रसारासाठी आमरण लेखणी झिजवून गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म इ.साहित्य संपदेतून परखड विचार प्रकटीकरण केले.
अशी असावी जीवनगाथा,तोच व्हावा अभंग,विरून जाव्या सागर लाटा,तोच उमटावा तरंग त्यांच्या आचार विचारातून, त्यांच्या किर्ती - स्फूर्तीचा सुगंध सदोदीत मनात तेवत ठेवूया अशा वंदनीय महात्म्यांना त्यांच्या जयंती दिनी
शतशः विनम्र अभिवादन... ! ! !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा