Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

जिहे कठापूरबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवू नये - नंदकुमार मोरे


जिहे कठापूरबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवू नये - नंदकुमार मोरे
वडूज प्रतिनिधी / शरद कदम  

        जिहे कठापूर योजनेतून खटाव तालुक्यातील ११ गावे वगळण्यात आली नसून तसा कोणीही जनतेमध्ये गैरसमज पसरवू नये. तसेच या ११ गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या माध्यमातून ठोस पाठपुरावा केला जाईल असे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
             यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे, माजी सभापती संदिपदादा मांडवे, प्रा.अर्जुनराव खाडे, प्रा.एन.एस उर्फ बंडा गोडसे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, बाजार समितीचे माजी सभापती विजय काळे, संचालक राजेंद्र कचरे, डॉ.प्रकाश पाटोळे, डॉ. संतोष देशमुख, शैलेंद्र वाघमारे, बाळासो पोळ, संतोष तारळकर, पोपट पाटील, विजय जगदाळे, शिवाजी साबळे, विनोद मोहिते, पोपट जगदाळे, सागर चंदनशिवे आदिंची उपस्थिती होती.


          यावेळी बोलताना नंदकुमार मोरे म्हणाले की, खटाव तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना जिहे कठापूरचे पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह जे बरोबर येतील त्यांना घेऊन व्यापक चळवळ उभारली जाईल. आणि आमदार शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख यांच्या माध्यमातून मंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर बैठक लावण्यात येणार आहे. प्रा.बंडा गोडसे म्हणाले, खटाव तालुक्यातील सर्व भागाला पाणी मिळणे हे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नी कोणीही राजकारण करू नये. आमदार शशीकांत शिंदे, मंत्री जयंत पाटील यांना तालुक्यात फिरू न देण्याचा इशारा अयोग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा.अर्जुन खाडे यांनीही या प्रश्नासाठी सर्व मतभेद विसरून तळमळीने काम करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ.संतोष देशमुख, बाळासो पोळ, शैलेंद्र वाघमारे, पोपट पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली.  
           यावेळी जर पक्षाने विरोधी भूमिका घेतली तर आपली भूमिका काय असेल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सर्वच पदाधिकारी म्हणाले की, जर पक्षाने विरोधी भूमिका घेतली तर आम्ही पक्ष व नेत्यांपेक्षा जनभावनेला अधिक महत्व देऊ.

---------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा