वडूजमध्ये लसीचे डोस वाढवा अन्यथा बोबाबोंब आंदोलन करणार -
नगरसेवक अनिल माळी यांचा इशारा
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव तालुक्यातील मुख्यालय असलेल्या वडुजमध्ये सुमारे ३० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. सध्या शहरात कमी प्रमाणात लस मिळत असल्याने अगदी धीम्या गतीने लसीकरण सुरू आहे. चार दिवसातून एकदा फक्त १५० ते २०० लसीचे डोस उपलब्ध होत आहेत. तर लस घेण्यासाठी ५०० ते ५५० लोक लसीकरण ठिकाणी गर्दी करतात. अनेकांना लसी विना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. याबाबत आरोग्य विभागाने तातडीनेलक्ष न घातल्यास भाजपच्या वतीने बोबाबोंब आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे नगरसेवक अनिल माळी यांनी दिला आहे.
वडूज सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज सुमारे ५०० डोस देणे आवश्यक आहे. यामध्ये प्रथम डोस घेतलेले सुमारे १५०० लोक आहेत. ८५ दिवस उलटून गेले तरी अजून त्यांना दूसरा ढोस मिळत नाही. तसेच पहिला डोस मिळण्यासाठी नोंदणी करणाऱ्या नागरिकांना वडूज मध्ये डोस उपलब्ध होत नाही. जिल्ह्याच्या ठिकाणाहून नियोजन करणारे आरोग्य अधिकारी जाणूनबुजून कोणताही निकष न लावता कमी प्रमाणात डोस उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये राजकारण केले जात आहे. त्यामुळे वडूज नगरीतील वृद्ध व अपंग लोकांना महिनाभर हेलपाटे मारावे लागत आहेत.
वडूजच्या चौकात वडूजच्या बाहेरील काही पक्षाचे नेते हे आपल्या सुप्रीमो यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलक लावतात. पण वडूजकरांना लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी यांनी मानवतेच्या भावनेतून वडूज मध्ये लसीकरण शिबीर लावून जनतेची काळजी घ्यावी. अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात खटाव तहसिल कार्यालयासमोर भाजपच्या वतीने बोबाबोंब आंदोलन करणार असल्याचे नमूद केले असून तहसिलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी माजी उपसरपंच शशिकांत पाटोळे, नगरपंचायत नियोजन सभापती प्रदीप खुडे, सोमनाथ जाधव, संजय काळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा