Breaking

मंगळवार, २७ जुलै, २०२१

वडूज परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत



वडूज परिसरातील रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत


वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

          हुतात्म्यांची भूमी असा गौरव झालेल्या वडूज ता खटाव नगरीत सध्या अनेक भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा व दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीची प्रतिक्षा दस्तुरखुद्द रस्त्यांना लागली आहे.
          खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीत विविध कामांसाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे व विविध संघटनेचे पदाधिकारी शासकीय व स्वमालकीच्या चार व दुचाकी वाहनांतून नेहमीच  ये-जा करतात. तसेच एस टी महामंडळ बस, रुग्णवाहिका या मधून प्रवाश्यांची वाहतूक होत असते. अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पण आंदोलन झाले की, तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती केली जाते. त्यानंतर 'जैसे थे परिस्थिती' अशी अवस्था उघड्या डोळ्यांनी वाहन चालकांना पहावी लागत आहे. वडूज नगरीतून दहिवडी, कराड, पुसेगाव, कातरखटाव, कुरोली, पेडगाव, वाकेश्वर अशा महत्वाच्या गावांना हे रस्ते जोडले गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे रस्ते असले तरी त्याची अवस्था ही शासकीय विश्रामगृह सारखी बनली आहे. अधिकारी आहेत पण, निधी नाही. लोकप्रतिनिधी आहेत पण, लक्ष नाही. अशी खुलेआम टीका होऊन सुध्दा 'हम नही सोचेंगे 'अशी काहींच्या बाबतीत अनुभव येऊ लागला आहे. वडूज नगरीत नगरपंचायत असली तरी सदरच्या रस्त्यावर नगरपंचायतील निधी टाकता येत नाही. तरी ही काही नगरसेवक हे स्वखर्चाने आपआपल्या भागातील रस्त्यावरील मोठे खड्डे मुरमाने बुजविण्याचा प्रयत्न करतात. त्याला काही आंदोलकांची ही साथ मिळते असे नगरसेवक काका तथा श्रीकांत बनसोडे,  सचिन माळी, जयवंत पाटील यांनी सांगितले .                        वडूज नगरीत येणाऱ्या सर्व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सध्या कॊरोना संकटाने सर्वांनाच अडचणीत आहे. अशा वेळी मानवता भावनेतून सर्वांनीच जनतेचे आरोग्य चांगले रहावे. अपघात होऊ नये यासाठी यथा शक्ती मदत करण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. किंबहुना ही बाब वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवली तर खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपल्याचे भाग्य मिळेल अशी प्रतिक्रिया वडूज नगरीचे सामाजिक कार्यकर्ते विजयदादा शिंदे, येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव,  डॉ संतोष देशमुख, आर पी आय चे कृणाल गडांकुश व शेतीसाठी वाहन चालविणारे शेतकरी वर्गाने दिली आहे. 
          वडूज नगरीच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी वॉर्डचा विचार न करता सर्व वडूज नगरीचा विचार करून नगरपंचायतीने रस्ते दुरुस्तीची मोहीम राबवली पाहिजे अशी मागणी वडूज नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी केली आहे.  
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा