सौ. रजनी अशोकराव पाटील यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड
सौ. रजनी अशोकराव पाटील.यांची खासदार म्हणून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली त्यांच्या विषयी .....
*महाड तालुका प्रतिनिधी/AJ 24 Taas News
थोडेसे.सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडले की डोक्यावर पदर घेतलेल्या हास्यवदनाच्या महिलेचा फोटो पाहिला की मन सुखावून जायचे. ताईंची बातमी वाचली आणि लिहायची ईच्छा झाली.
रजनीताई यांचे वडील आत्माराम बापू पाटील ,बोरगाव तालुका वाळवा जिल्हा .सांगली येथील रहिवासी होते. मागच्या पिढीतील लोकांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते परिचित होते. त्यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीत तेरा चौदा वर्ष ते सक्रिय होते. त्यांनी बराच काळ तुरुंगवास भोगला होता. त्यांना स्वातंत्र चळवळीत दोन वेळा आजन्म कारावासाची शिक्षा त्यावेळी झाली होती.
ताईंचे काका जनार्दन व रामचंद्रनाना यांनाही स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. एकाच कुटुंबातील तीन भाऊ तुरुंगवास भोगलेले हे ताईंचे कुटुंब होते. जनार्धन काकांचा विवाह तुरुंगातच झाला होता. ताईंच्या काकींनी तुरुंगात जाऊन त्यांच्या गळ्यात सुताचा हार घालून गांधी पद्धतीने विवाह केला होता. इंग्रज सरकारने ताईंच्या माहेरची सर्व शेती जप्त केली होती. राजकारणामध्ये ताईंच्या वडिलांचा चांगला सहभाग होता. १९३७ साली ताईंचे वडील पार्लमेंट बोर्डावर निवडून गेले होते. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूही त्या पार्लमेंट चे सदस्य होते. देशात प्रथम क्रमांकाच्या मतांनी पंडीत नेहरू तर ताईंचे वडील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी निवडून आले होते.
ताईंच्या वडिलांनी स्वातंत्र्याच्या काळात गोवा मुक्ती संग्रामातही भाग घेतला होता. आईचाही स्वातंत्र्य चळवळीत व गोवा मुक्ती संग्रामात मोठा सहभाग होता. ताईंचे आजोबा हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे ही स्वातंत्र्यवीर होते. ते गदर मुव्हमेंटचे संस्थापक होते. त्यांना इंग्रज सरकारने १९१५ साली लाहोर येथे फाशी दिली होती. या सर्व कौटुंबिक पार्श्वभूमीचा ताईंच्या व्यक्तिगत जीवनावर चांगलाच परिणाम झाला होता.
थोरा मोठ्यांचे येणे जाणे त्यांच्या घरी नेहमीच असे .या सर्वांचा सहवास ताईंना लाभला होता .ताईं रहात असलेल्या सदाशिव पेठेत मात्र जन संघाचा प्रभाव होता. ताईंची सभा संमेलनाला कायमच उपस्थिती असे.
मात्र वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या निधनामुळे ताईंना मोठ्या दुःखद प्रसंगाला व परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांच्या आईने त्यांच्या चार भावंडाचे संगोपन, शिक्षण मोठ्या जिद्दीने केले. ताई पुण्यामधे फर्ग्युसन महाविद्यालयातून बीए झाल्या होत्या. त्यावेळी त्या यू.आर. म्हणून निवडून आल्या . १९७९ साली त्यांची पुणे विद्यापीठाच्या सिनेट वर निवड झाली होती. त्या नॅशनल स्टुडन्टस , युनियन ऑफ इंडियाच्या त्या जनरल सेक्रेटरीही होत्या.तेथेच त्यांची ओळख अशोकराव पाटील यांच्याशी झाली. आणि दोन्ही कुटुंबातील मंडळींनी १९८२ साली ताईंचा विवाह घडवून आणला . कै.पतंगराव कदम साहेब यांनी पुढाकार घेऊन मोरे विद्यालय पुणे येथे ताईंचा विवाह अशोकराव पाटील यांच्याशी लावून दिला होता. श्री .अशोकराव पाटील हेही त्यावेळी युवक काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते होते. पुढे त्यांना केज जिल्हा .बीड या मतदारसंघातून काँग्रेसचे तिकीट मिळाले व ते निवडून आले. माननीय शंकरराव चव्हाण यांच्यामुळे ताईंचा राजकीय प्रवास सुखकर झाला होता.
कै.शंकरराव चव्हाण त्यांच्याकडूनच प्रशासन म्हणजे काय? हे त्या शिकल्या.अशा दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या व्यक्तींच्या मंत्रिमंडळात श्री अशोकराव पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून समावेश झाला. ताई व अशोकराव एकत्रित पुढे काँग्रेस पक्षाचे कार्य करू लागले.
१९८७ मध्ये राजीव गांधी यांनी दुष्काळी दौर्यात केजला भेट दिली होती .त्याच वेळी सहकारी साखर कारखान्याला त्यांनी मंजुरी दिली. महाराष्ट्रात ज्यांनी पहिल्या साखर कारखान्याची स्थापना केली होती ,त्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या महान कार्याची आठवण राहावी म्हणून. या कारखान्याला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव दिले.कै.राजीवजी गांधी ज्या ठिकाणी भाषणाला ऊभे होते त्या जागी हा कारखाना उभारला आहे.
१९९२ मध्ये ताईने पहिली जिल्हा परिषद निवडणूक लढवली .पाच वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेत काम करून तेथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
बीड जिल्ह्यातील प्रश्नांचा अभ्यास करताना जिल्ह्यात रेल्वे नाही, औद्योगिक विकास नाही त्यावेळी ताईने रेल्वेचा विषय मार्गी लावला. जो कोणी रेल्वे देईल तो खासदार असे त्यावेळी जनमत तयार झाले.
या काळात ताईंनी अहमदनगर ते बीड रेल्वेला मंजूरी मिळवून घेतली. जनतेला दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता करून घेतली .लोकसभेत देशातील विविध प्रश्न राष्ट्रीय स्तरावर कसे सोडवले जातात याचा अनुभव त्यांनी घेतला. प्रश्नाचा आवाका मोठा असतो तो सोडवताना सर्वंकष विचार करावा लागतो. हे ताईने चांगलेच अनुभवले होते.लोकसभेच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात देशातील विविध प्रश्न राष्ट्रीय स्तरावर कसे सोडवले जातात याचा ताईनी चांगलाच अनुभव घेतला.
ताईनी महाराष्ट्र प्रदेश महिला प्रदेशचे अध्यक्षपद संभाळून पक्षाच्या संघटनेचे काम केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी महिलांच्या विकासाच्या कामात लक्ष घातले होते. कै.इंदिरा गांधी, कै.वसंतदादा पाटील ,कै.शंकरराव चव्हाण हे ताईंचे राजकीय आदर्श होते. वसंतदादांनी मुलींच्या व गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ताईंना केजमध्ये हायस्कूल मंजूर करून दिले. आज माऊली विद्यापीठ केज या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी त्या प्रयत्न करत आहेत .या शिक्षण संस्थेच्या आता १६ शाळा, ३ जुनियर कॉलेज व १ डी.एड कॉलेज आहे.
ताईंचे पती श्री. अशोकराव पाटील हे ताईंना नेहमीच सहकार्य करतात. सर्व कुटुंबाच्या सहकार्यामुळे व पाठिंब्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास सुखकर झाला आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणात ही ताईंचा महत्त्वाचा सहभाग आहे. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्या प्रयत्न करतात. महिलांनी बचत करून जमवलेल्या पैशावर रिझर्व बँकेकडून कर्ज घेऊन महिलांनी गृह उद्योग करण्यासाठी त्या प्रयत्न करतात. औद्योगिक क्षेत्रात मंदी आहे. युवकांनी धडपड करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला परदेशी बाजारपेठ निर्यातीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते.
डॉक्टर जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू स्मारक ग्रंथासाठी मदत म्हणून उत्तर प्रदेशच्या मायावती सरकारकडून ताईंनी त्यावेळी पाच लाख रुपये अनुदान मिळवून दिले होते.
अशा या कर्तृत्वशालिनीची राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा
💐💐💐💐💐
शुभेच्छुक/ लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा