रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा पैसा जातो कुठे ?

महाड रायगड मार्गावर झुडपांचे तर भोराव पुलावर गवताचे साम्राज्य
महाड – प्रतिनिधी
महाड मधील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग बांधकाम विभागाकडून त्यांच्या ताब्यातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असून नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळला जात आहे. येथील महाड रायगड मार्गावर अर्ध्या रस्त्यात झाडाझुडपांच्या फांद्या तर महाड पुणे मार्गावर भोराव पुलावर गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
महाड मधील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या, पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेली दोन वर्ष महामार्ग बांधकाम विभागाकडे महाड रायगड मार्गावरील कोंझर घाटातील धोकादायक वळणांवर आलेल्या झाडाझुडपांच्या फांद्या आणि खड्ड्यांबाबत तक्रारी केल्या जात आहेत मात्र कायम व्यस्त असल्याचे दाखवणाऱ्या महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या जीविताशी कांहीही देणेघेणे नसल्याचे यावरून दिसून येत आहे. कोंझर घाटात धोकादायक वळणांवर अर्ध्या रस्त्यात आलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसून येत नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत कायम तक्रारी केल्या मात्र महामार्ग बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महाड रायगड मार्ग हा दुपदरीकरण केला जात असल्याने त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेली दोन वर्ष हे काम रखडलेले आहे. निविदा प्रक्रीयेप्रमाणे रस्त्याच्या ठेकेदाराकडे याची देखभाल दुरुस्ती आहे मात्र रस्त्याच्या ठेकेदाराने हे काम सोडले आहे.
हिच अवस्था महाड भोर पुणे मार्गावर असलेल्या भोराव पुलावर झाली आहे. भोराव पुलावरून यावेळी पुराचे पाणी गेल्याने पुलाच्या कठड्याजवळ माती, झुडपांच्या फांद्या आणि गवत येवून अडकले आहे. मात्र गेली दोन महिन्यापासून पुलावरील स्वच्छता केली गेलेली नाही. यामुळे कठड्याजवळ कंबरेइतके गवत उगवले आहे. यामुळे ऐन रात्रीच्या सुमारास दोन वाहने ये जा करत असताना धोका निर्माण झाला आहे. या या रस्त्यावर देखील आकले गावाजवळ खड्डे आणि वळणावर झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. अपघाताचा धोका टाळण्यासाठी गवत आणि रस्त्यात आलेली झुडपे काढणे आवश्यक आहे. याकरिता प्रतिवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी पैशाची तरतूद केली जाते. मात्र देखभाल दुरुस्तीच्या नावाने बोंबाबोंब असून हा पैसा जातो कुठे असा सवाल वाहनचालक उपस्थित करत आहेत.
देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने पूल आणि रस्ते कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे. भोराव पुलावर गेली महिनाभरापासून गवत उगवले आहे शिवाय पुराबरोबर आलेली लाकडे स्थानिक नागरिकांनी बाजूला केली आहेत. संबंधित विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे – इफ्तिकार काळसेकर सामाजिक कार्यकर्ते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा