डाव्या कालव्यातून रब्बसाठी उजनीतून 27 जानेवारीला पाणी
टेंभुर्णी प्रतिनिधी/:- उजनी धरणात सध्या एकूण 121.62 टीएमसी पाणी असून त्यात 57.96 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या धरणातील पाण्याची टक्केवारी 108.19 टक्के इतकी आहे. मागच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेले यंदा शेती व सोलापूर शहराला उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणार नाही. 27 जानेवारीला रब्बी पिकांसाठी कॅनॉल, बोगदा व उजवा आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे.
सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, परंतु मागील काही वर्षांत साखर कारखानदारीच्या माध्यमातून खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उजनी धरण हे सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे. दरम्यान, रब्बीच्या तुलनेत खरीप पिकांखालील क्षेत्र वाढल्याने जलसंपदा विभागाने उजनीतून पाणी सोडवण्याच्या नियोजनात बदल केला आहे. तरीही, रब्बीखालील पिकांचे क्षेत्र लक्षणीय असल्याने आता शेती पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा विभागाने आता जानेवारीअखेर (27 जानेवारीपासून) उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. कॅनॉल, बोगदा, कालव्यातून जवळपास पाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर साधारणत: फेब्रुवारीअखेरीस दुसरे आवर्तन सोडले जाईल, असा अंदाज आहे. यंदा उशिरापर्यंत नदीत पाणी असल्याने आणि शेतकऱ्यांचे पाण्याचे साठे पाण्याने भरल्याने धरणातील पाणीसाठा मायनसमध्ये जाणार नाही, असा विश्वास जलसंपदा विभागाला आहे.
कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय
रब्बी पिकांसाठी 27 जानेवारीला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होईल. धरणात सध्या 100 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा