“ग्रामसुरक्षा यंत्रणा मदत क्रमांकाच्या सहायाने अनेक अनर्थ टळले.”
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद जिल्हा : संपुर्ण भारतभरासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा टप्प्या-टप्प्याने राबवली जात असून या योजनेत विनाशुल्क संपर्क क्रमांक 1800 270 3600 हा कार्यान्वित आहे. या योजनेत आपला भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून समाविष्ट झालेल्या ग्रामस्थांना गावातील संभाव्य / घडलेल्या धोक्याची माहीती अगदी 2 मिनीटांत भ्रमणध्वनीवर प्राप्त होत आहे. योजनेत सहभागी ग्रामस्थाने उपरोक्त संपर्क क्रमांकावर गावातील त्या संभाव्य किंवा घडलेल्या धोक्याचा मदत संदेश देताच स्वयंचलित यंत्रणेने तो मदत संदेश पुढच्या मिनीटास गावातील सहभागी व्यक्तींच्या व स्थानिक पोलीस अंमलदारांच्या भ्रमणध्वनीवर ऐकवला जातो. यातून ग्रामस्थ सतर्क होउन गावातील संभाव्य चोरी, दुर्घटना टाळण्यास, मदतकार्य करण्यास मदत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांत जिल्हा परिषद व उस्मानाबाद पोलीस यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबवला जात असून इतर गावांत हा उपक्रम लवकरच सुरु होत आहे. गेल्या 2 महिन्यांत प्रशासनाने हा उपक्रम लोकप्रिय केला असून त्याचा अनेक नागरीक लाभ घेत आहेत.
दि. 05.02.2022 रोजी कळंब तालुक्यातील एकुरका व तांदुळवाडी तर तुळजापूर तालुक्यातील नांदगाव अशा तीन गावांतील ऊस पिकास आग लागल्याचे अनुक्रमे ग्रामस्थ- श्रीकांत भिसे, आप्पासाहेब काळे, समर्थ पाटील यांना समजताच त्यांनी तात्काळ उपरोक्त मदत क्रमांकावर संपर्क साधून मदत संदेश प्रसारीत केला. लागलीच तो मदत संदेश स्थानिकांच्या भ्रमणध्वनीवर ऐकवला गेल्याने तात्काळ ग्रामस्थ सतर्क होउन तीन्ही गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावातील शेत पिकातील आग आटोक्यात आणुन पुढील अनर्थ टाळला. तसेच दि. 06.02.2022 रोजी मध्यरात्री कळंब तालुक्यातील मंगरुळ गावात 8-10 संशयीतांचे टोळके ग्रामस्थ- अमोल शिंदे यांना दिसताच त्यांनीही तात्काळ उपरोक्त मदत क्रमांकावर संपर्क साधल्याने ग्रामस्थांनी व पोलीस यंत्रणेने तात्काळ प्रतिसाद देउन त्या भागात सतर्कता बाळगल्याने त्या संशयीतांचा डाव फसला.
उपरोक्त यंत्रणा लोकप्रिय व यशस्वी करण्यात जनतेने सहकार्य करुन आपल्या गावातील संभाव्य अनर्थ टाळावेत. असे आवाहन पोलीस अधीक्षक मा. श्रीमती नीवा जैन यांनी जनतेस केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा