उचल पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कालव्यातून व बोगद्यातून पाणी सोडले ...
आ. बबनदादा शिंदे यांच्या मागणीला जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांची मान्यता ....
बेंबळे।प्रतीनीधी
उजनी धरणाच्या कालव्यातून व बोगद्यातून विद्युत पंपाद्वारे उचल पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या साठी तातडीने पाणी सोडणे विषयी आ. बबनदादा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचेकडे केलेल्या मागणीला त्यांनी तत्वतः मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करण्याचा आदेश दिला व त्यानंतर जलसंपदा विभाग सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी अंमलबजावणी करून गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून 300 क्युसेक्स तर भीमा- सीना जोड कालवा (बोगद्यातून) 200 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे.
सविस्तर माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की उजनी धरणातून 28 जानेवारी 22 पासून कालवा व बोगद्यातून शेतीसाठी पहिले आवर्तन सुरु केले व दोन मार्च 22 रोजी ते पाणी बंद करण्यात आले. परंतु याच महिन्याच्या कालावधीमध्ये कालवा, बोगदा ,नदी आदी ठिकाणच्या शेतीसाठी उचल पाणी घेणाऱ्या वीज पंपांची कनेक्शन्स, वीज बिल वसुली साठी, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी डीपी पासून तोडून टाकून विज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले. परंतु या विरुद्ध शेतकर्यामधुन वीज मंडळाच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला व त्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांनी पुढे, वसुलीसाठी काही सवलती जाहीर करून शासनाने पुन्हा शेतकऱ्यांची विद्युत कनेक्शन्स जोडून देण्याचे आदेश दिले. परंतु या 15 ते 20 दिवसांच्या काळात विद्युतपुरवठ्या अभावी पंप बंद पडले असल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली . दरम्यान नियोजनाप्रमाणे एक महिन्यानंतर दोन मार्च रोजी कालवा आणि बोगद्यातील पाणी पाटबंधारे खात्याने बंद केले. 'पाणी होते तेव्हा वीज कनेक्शन तोडले अन् वीज पुरवठा सुरु झाला आणि पाणी बंद करण्यात आले'. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो- हजारो शेतकऱ्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व फोन द्वारे शेतीसाठी उचल पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या साठी कालवा व बोगद्यातून, विद्युत मोटारींचे फुटबॉल कायम पाण्यात बुडते राहावे एवढे तरी पाणी सोडणे विषयी आग्रही साकडे घातले. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही रास्त मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी मुंबईमध्ये जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांचे निदर्शनास आणून दिली व त्या प्रमाणे तातडीने आदेश व्हावा अशी पत्राद्वारे आग्रही मागणी केली. आ.बबनदादांच्या मागणीचा तात्काळ विचार करून ना. जयंत पाटील यांनी तातडीने पाणी सोडण्याचा आदेश दिल्यामुळेच गुरुवारी 24 तारखेला सकाळपासून कालव्यातून 300 क्युसेक्स व बोगद्यातून 200क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे .त्यामुळे आता उचल पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे व शेतकर्यामधुन समाधान व्यक्त होत आहे.
चौकट....
5 एप्रिल 22 पासून पाटबंधारे खात्याचे उन्हाळी हंगामाचे कालवा आणी बोगद्यातून दुसरे आवर्तन सुरू होणार आहे, तोपर्यंत शेतीसाठी उचल पाणी घेण्यासाठी कलवा व बोगद्यातून पाणी चालूच राहील अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा