परसराम तांडा (उमरा) येथे कडब्याची गंजी जळून खाक
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : उमरा गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या परसराम तांडा उमरा तालुका लोहा येथील तांड्यालगत असलेल्या कडब्याच्या गंजिस अचानकपणे लागलेल्या आगीत चार शेतकऱ्यांचा एक लाख रुपये किमतीचा पाच हजार कडबा आगीत जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी घडली ,दरम्यान कंधार येथून आलेल्या अग्निशमन वाहनाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवत आग विझवली.आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
परसराम तांडा येथील शेतकरी श्रावण राठोड ,जयपाल राठोड, सुरेश राठोड ,दत्ता राठोड यांच्या दांड्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत रचून ठेवलेल्या कडब्याच्या गंजिस अचानकपणे गुरुवारी दुपारी आग लागली महिलांनी आरडाओरडा केला.तांड्यातील युवक व नागरिकांनी धावा धाव करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र तळपत्या उन्हामुळे व वाऱ्याने आगीने रोद्ररूप धारण करत लगतच्या कडब्याच्या गंजिस कवेत घेतल्याची माहिती तांडावासीयांनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांना दिली.त्यांनी कंधार येथील अग्निशमन दलास पाचारण केले व बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आली.मात्र या आगीत चार शेतकऱ्यांचा कडबा जळून खाक झाला.उमरा सज्जाच्या तलाठी पूजा राणी कुंटूरकर यांनी घटनास्थळी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयास पाठविल्याची माहिती दिली असून पशुपालक शेतकऱ्यास शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.घटनास्थळी उस्माननगर पोलीस दाखल झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा