अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम शेतकऱ्यांनीच केलं, सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेऊन नये
राजू शेट्टी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल
महाड - ( प्रतिनिधी)
या भारत देशाची अर्थव्यवस्था नेहमीच मजबूत करण्याचं काम शेतकऱ्यांनी केले आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पाठ थोपटून घेऊ नये तसेच त्याचे श्रेय देखील घेऊ नये. असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लगावला. ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर सत्तेसाठी केला जात आहे त्या छत्रपती शिवरायांचा शेतकऱ्यांबाबतचा विचार पोहोचविण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान किल्ले रायगडावरून सुरू केले जात असल्याचे राजू शेट्टी यांनी महाडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
महाड मधील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले एक जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून किल्ले रायगडावरून शेतकऱ्यांचे जनजागृती अभियान सुरू होत आहे. याकरिता राज्यभरातून हजारो शेतकरी रायगडावर दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर या अभियानाची माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी देशातील शेतकरी हरितक्रांतीनंतर कशा पद्धतीने आधुनिकीकरणात आणि त्यातून कर्ज प्रकरणात अडकत गेला हे सांगितले. वातावरणीय बदलामुळे संकरित शेती तग धरत नसून परंपरेनुसार जुने बियाणे उत्पादन क्षमता कमी असली तरी वातावरणीय बदलांमध्ये टिकून होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. आधुनिक शेतीकरणांमध्ये खतांचा वाढता वापर हा देखील त्यास कारणीभूत आहे.
शेतकरी जगला पाहिजे याचे गांभीर्य सरकारला राहिलेले नाही.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधी पक्ष देखील शेतकऱ्यांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देत नाही. अशी खंत व्यक्त करीत सत्ता प्राप्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शेतकऱ्यांबाबतचा विचार जाणून घेतला पाहिजे असा सल्ला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
सध्याचे सरकार हे अधिकाऱ्यांच्या बदल्यां मधून किती पैसे मिळतील यामध्ये गुंतलेले आहे. शेतकरी, विद्यार्थी, शिक्षण, आरोग्य या प्रश्नांवर मात्र लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही असा आरोप केला.
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मजूर सर्वसामान्य नागरिक यांच्या मूलभूत प्रश्नांकडे बगल देण्यासाठी सध्या समान नागरी कायद्यासारख्या चर्चासमोर आणल्या जात आहेत. असे त्यांनी शेवटी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा