बार्शी तिथं #सरशी ! मनोज जरांगेंच्या आंदोलनावरील पहिलं पुस्तक #बार्शीतून
बार्शी : एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरूणाने आपल्या जिवाची बाजी लावत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण मराठा समाज एकवटला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनावर आंतरवाली ते मुंबई हे पुस्तक येत्या आज प्रकाशित होत आहे. प्रकाशनापूर्वीच या पुस्तकाला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मागणी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे बार्शीपुत्र पत्रकार प्रताप नलावडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे, बार्शी तिथं सरशी ही म्हण पुन्हा एकदा सत्यात उतरली आहे.
प्रकाशनापूर्वीच राज्यभरातून अनेकांनी या पुस्तकासाठी नोंदणी केली असून तामीळनाडू, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरातमधूनही वाचकांनी पुस्तकासाठी नोंदणी केली आहे. गेली वीस वर्षे मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून अतिशय प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या आंतरवाली सराटीतून सुरू झालेल्या आंदोलनाची सविस्तर कहाणी या पुस्तकात मांडली आहे. आंतरवाली सराटीत झालेला लाठीचार्ज, सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवाद जसा या पुस्तकात आहे,
तसाच मनोज जरांगे पाटील यांच्या एकूणच वीस वर्षाच्या आंदोलनाचा आढावाही आहे. त्यांच्या रोखठोक शैलीतील भाषणांचा आणि राज्यव्यापी दौऱ्याचाही वृत्तांत या पुस्तकात मांडण्यात आला आहे. मराठा आरक्षणाची आवश्यकता, आरक्षणासाठी आजवर दिलेले लढे, कायदेशीर लढा देणारे विनोद पाटील यांची कहाणी, आणि मराठा अभ्यासकांनी आरक्षणाची केलेली मांडणीही या पुस्तकात आहे. राजकीय मंडळींशी जरांगे पाटील यांचा झालेला वाद आणि बीडमध्ये आंदोलनाला लागलेल्या हिंसकवळणाचीही कहाणी या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा