#रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना गावठाण जागेमध्ये घर बांधण्यास परवानगी द्यावी - सुजित सातपुते
#जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी..!
पिलीव/प्रतिनिधी प्रमोद भैस
*******************
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत गोरगरीब व गरजू लोकांचे एकूण नऊ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. परंतु एक दोन अपवाद वगळता यातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी स्वतःच्या नावावरती असलेल्या मालकी हक्काच्या जागेचा उतारा नाही.अशीच काही माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांची अडचण आहे.घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी मालकी हक्काचा स्वतःच्या नावावर असलेला जागेचा उतारा किंवा ७/१२ उतारा असणे बंधनकारक आहे.परंतु काही लाभार्थी १९७२ सालापासून गावठाण च्या जागेमध्ये वास्तव्यस असून त्या जागेच्या उताऱ्या वरती मालक म्हणून सरकारचे नाव तर भोगवटदार म्हणून संबंधित लाभार्थ्याचे नाव येत आहे.रमाई घरकुल आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या गावठाण जागेचा उतारा ग्राह्य धरला जात नाही.त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजूर असूनही घरकुलाचा लाभ घेता येणार नाही.ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित सातपुते यांनी काल बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांना निवेदन देऊन रमाई घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना ज्या जाचक अटी लावल्या जातात त्या शिथिल कराव्यात व गावठाण जागेच्या उताऱ्या वरती घरकुल बांधण्यास रीतसर परवानगी द्यावी अशी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.निवेदनाची त्वरित दखल घेऊन गोरगरीब व गरजू लोकांच्या संबंधित प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास सर्व लाभार्थ्यांना घेऊन सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे सुजित सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा