Breaking

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

टेंभुर्णी- म्हसवड रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर वर तत्काळ कारवाई करा अन्यथा शिवसेना तिव्र आंदोलन करेल - मधुकर देशमुख*

*टेंभुर्णी- म्हसवड रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर वर तत्काळ कारवाई करा अन्यथा  शिवसेना तिव्र आंदोलन करेल - मधुकर देशमुख*
******************************


टेंभुर्णी (प्रतिनिधी )   टेंभुर्णी-म्हसवड महामार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडविणाऱ्या एमएसआरडीसीचे अधिकारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा १५ दिवसात शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा माढा ता.शिवसेना प्रमुख मधुकर देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
एम.एस.आर.डी.सी.चे पुणे येथील अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, टेंभुर्णी-म्हसवड या महामार्गाचे काम गेल्या दोन-तीन वर्षापासून कूर्म गतीने सुरू असून काम करण्यासाठी अत्यंत चांगला डांबरी रस्ता ठीक-ठिकाणी उकरून ठेवला आहे.ज्या कॉन्ट्रॅक्टर ला काम दिले आहे त्याने काम न करता उगीच रस्त्यावर मोठमोठे खड्डे खोदुन ठेवले आहेत.हे खड्डे दोन वर्षांपासून तसेच पडून आहेत.यामुळे वाहन चालवताना चालकांना खड्डे चुकवीत कसेबसे जावे लागते.तीव्र खड्ड्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान होत आहे.सतत अपघात होत आहेत.पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठुन राहते.अर्ध्या तासाच्या प्रवासास तासनतास वेळ जात आहे.



शेवरे ते संगम दरम्यान सात फूट खोल खड्डा खोदून तो अनेक महिन्यापासून तसाच पडून आहे.यामुळे रस्ता पूर्णपणे बंद आहे.तरीही रस्ता बंद असल्याचा साधा फलक तेथे लावलेला नाही.खड्ड्यात फसलेल्या चारचाकी वाहनास क्रेन द्वारे बाजूला काढावे लागत आहे.टेंभुर्णी अकलूज मार्ग एवढा महत्वाचा आहे की,या मार्गावरून कर्नाटकसह विविध राज्यातून  दिल्ली,हरियाणा,जम्मू-काश्मीर,गुजरात,राजस्थान,मध्यप्रदेश आदी राज्यात जाणाऱ्या मालवाहू अवजड मालट्रक जात आहेत.यामुळे अवजड वाहतूक करणारी वाहने व कार यांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सध्या ऊस गळीताचा हंगाम सुरू असून या मार्गावरून १५ ते २० कारखान्यांना ऊस पुरवठा करणारी शेकडो अवजड वाहने दररोज ये-जा करीत आहेत.ऊस पट्ट्यातील हा मार्ग आहे.ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे खड्डयांमुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन वेळ वाया जात आहे.यामुळे वाहन चालक या मार्गावरून ये-जा करण्यास तयार होत नाहीत.परिणामी शेतकऱ्याचे नुकसान होण्याचा धोका आहे.
माढा,करमाळा तालुक्यातून अकलूज येथे दररोज शेकडो रुग्ण उपचारास जात आहेत.त्यांना हाच मार्ग जवळचा आहे.या खराब रस्त्यामुळे रुग्ण वेळेवर पोहचत नाहीत.कित्येकजण वेळेत न पोहचल्याने पोहचेपर्यंत मयत झाले आहेत.
यामुळे या गैरसोयीस जबाबदार असलेल्या संबंधित कंपनीचे अधिकारी,ठेकेदार व एम एस आर डी सी चे संबंधित अधिकारी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा १५ दिवसात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे,जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना पाठविल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा