मानेगाव गटातील मुदत संपणा-या 20 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त
शासनाने राजकीय व्यक्तींऐवजी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली संधी
माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड
- माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीची मुदत नोव्हेंबर अखेर संपत असल्याने याठिकाणी राज्य शासनाने प्रशासक नियुक्त केले असून यापैकी मानेगाव जिल्हा परिषद गटातील 20 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शिक्षण व कृषी विभागाचे विस्ताराधिकारी,कृषी अधिकारी, केंद्रप्रमुख,आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे या विविध शासकीय पदावर कार्यरत व्यक्तींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूका लांबल्याने प्रथमच ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे.
मानेगाव गटातील या 20 ग्रामपंचायतींची मुदत 10 ते 22 नोव्हेंबर 2020 दरम्यान संपत आहे.सध्याच्या भयंकर कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य नाही त्यामुळे या मुदत संपलेल्या गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा व पश्न सोडविण्यासाठी राजकीय व्यक्तींची नियुक्ती न करता प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे.कुर्डुवाडी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांची कुंभेज,वाकाव, विठ्ठलवाडी,लोंढेवाडी,खैरेवाडी, वडाचीवाडी (अं.उ) तर शिक्षण विस्ताराधिकारी बंडु शिंदे यांची उंदरगाव,मानेगाव,केवड- चव्हाणवाडी,केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांची अंजनगाव उमाटे, जामगाव,सुलतानपूर केंद्रप्रमुख खातूनबी आतार यांची तांदुळवाडी, कृषी अधिकारी संभाजी पवार यांची रिधोरे,आरोग्य पर्यवेक्षक एन.एस. चव्हाण यांची धानोरे,खैराव, कापसेवाडी-हटकरवाडी,बुद्रुकवाडी तर अंगणवाडी पर्यवेक्षिका रतन शिंदे यांची महातपूर,निमगाव (मा.) या ठिकाणी प्रशासक म्हणून शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. काही अधिका-यांकडे एका पेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे ते प्रत्येक गावातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या व प्रश्नांना न्याय देतील का ? एखाद्या गावात आकस्मिकपणे गंभीर प्रश्न निर्माण झाला तर ते वेळेत पोहोचणार का ? सर्वसामान्य जनतेची गा-हाणी ऐकून घेतील का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
माढा तालुक्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींवर शासनाच्या वतीने प्रशासक नियुक्त केले असून ज्या गावातील ग्रामपंचायतीची मुदत ज्या तारखेला संपते त्याच दिवशी त्वरित संबंधित प्रशासक कारभार पाहणार आहेत तत्पूर्वी सर्वांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायत कामकाजाविषयी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाणार आहे त्यामुळे शक्यतो जनतेची मुलभूत कामे व सुविधा वेळेवर सोडविल्या जातील तसेच जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत गावोगावच्या जनतेने प्रशासकांना सहकार्य करावे असे आवाहन माढ्याचे गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील यांनी केले आहे.
फोटो ओळी - गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा