साहेब,आधी जुनी पेन्शन योजना व प्रचलित टप्पा अनुदानाचे काय झाले ? ते बोला मग पसंती क्रमांकाचे ठरवू
नोकर भरती प्रक्रिया, तालुक्यात सेवायोजन व मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रे कधी सुरू होणार ?
शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदारांकडून उपस्थित होताहेत सवाल
माढा / प्रतिनिधी-राजेंद्र गुंड
AJ 24 Taas News Maharashtra channel
- सध्या सगळीकडे शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षाबरोबरच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या अपेक्षेने प्रचार सुरू केला आहे.प्रचाराच्या रणधुमाळीत काहीजण गाठीभेटी,कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाहीरनामा, व्हाट्स अप व फेसबुकसह सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार तर काहीजण थेट मतदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून 1 डिसेंबर रोजी मतदानाच्या वेळी पसंती क्रमांक 1 देण्याचे आवाहन करीत आहेत परंतु त्याच वेळी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदारांकडून खडे सवाल उपस्थित केले जात आहेत ते म्हणजे साहेब,आधी जुनी पेन्शन योजना व प्रचलित टप्पा अनुदानाचे काय झाले ? ते बोला मग पसंती क्रमांकाचे ठरवू असा संतप्त सवाल शिक्षक मतदारांमधून उपस्थित केले जात आहेत तर नवीन नोकर भरती प्रक्रिया,प्रत्येक तालुक्यात सेवायोजन कार्यालय आणि मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रे कधी सुरू होणार ? असे प्रश्न पदवीधर मतदारांकडून उपस्थित होत आहेत त्यामुळे शिक्षक व पदवीधर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रंगत अधिकच वाढली असून उत्तरे देताना समोरच्यांची भंबेरी उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विशेषतः शिक्षक मतदारसंघातून उभे असणाऱ्या उमेदवारांना या 2 ज्वलंत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे ज्या विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरू आहेत त्या शाळांना 20 टक्के अनुदानाचा पहिला टप्पा 2 वर्षांपूर्वी मंजूर झाला परंतु प्रचलित टप्पा अनुदान पद्धतीनुसार दरवर्षी टप्पा वाढ होणे आवश्यक होते परंतु तो टप्पा अनुदान वाढीचा विषय शासन दरबारी प्रलंबितच राहिला आहे. हजारो शिक्षक टप्पा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर जे शिक्षक सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही तेंव्हा हे दोन प्रश्न मागील दोन निवडणुकीपासून प्रचाराच्या दरम्यान चर्चेत येतात आणि एकदा निवडणूक झाली की या प्रश्नांकडे फारसे गांभीर्याने कोणी लक्ष देत नाहीत त्यामुळे आज रोजी महाराष्ट्रातील हजारों शिक्षक अस्वस्थ आहेत.हे महत्त्वाचे दोन प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत परिणामी संबंधित शिक्षक मतदारांमध्ये सध्या प्रचारा दरम्यान याबाबत उमेदवारांकडे थेट विचारणा होत आहे तेंव्हा अनेक उमेदवारांना या प्रश्नांचे गोलमाल व उडवाउडवीच्या शब्दांत उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. सध्या अनेक उमेदवार हे दोन महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देत वेळ मारून नेण्याची भूमिका बजावत आहेत तेंव्हा ख-या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची क्षमता व ताकद कोणामध्ये आहे हे सुज्ञ व जागरूक मतदार निश्चितपणे विचार करून आपला हक्क बजावतील परंतु यानिमित्ताने उमेदवारांना प्रचार करताना मतदारांकडून खडे सवाल व प्रतिप्रश्न विचारुन भांबावून सोडले आहे हे मात्र नक्की आहे.
पदवीधर निवडणूकीत सुद्धा अनेक उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत परंतु त्यांना सुद्धा प्रचारादरम्यान अनेक प्रश्न केले जात आहेत.सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आमच्या नोकरीचे काय ? शासनाने बंद केलेली नोकर भरती प्रक्रिया कधी सुरू होणार ? मागच्या निवडणुकीत आम्ही तुमच्याच पक्षाला मतदान केले होते परंतु आमचे कोणतेही काम झाले नाही अगर एकही प्रश्न सुटला नाही.फक्त निवडणूकीत मत मागायला येता आणि नंतर 6 वर्षे गायब होता त्यामुळे आमच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे व आमच्यासाठी वेळ देणा-या उमेदवारांचाच आम्ही विचार करू असे बोल उमेदवारांना सुनावले जात आहेत त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत मतदारांना गृहीत धरून निवडणूक जिंकण्याची भाषा राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार करीत आहेत ते कितपत योग्य आहे. सुज्ञ व जागरूक मतदार राजा नेमका कोणाच्या बाजूने कौल देतोय हे पाहण्यासाठी निवडणूक निकालांची वाट पहावी लागणार आहे हे मात्र नक्की आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा