*अवैध धंदे व खोट्या गुन्ह्याच्या विरोधात करमाळ्यात सर्वपक्षीय आमरण उपोषण*
*अतुल वारे पाटील- करमाळा*
करमाळा शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी करमाळा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला तालुक्यातील सर्व पक्ष,संघटना , सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून पाठिंबा मिळत आहे.
याबाबत बोलताना वंदे मातरम् शक्ती सेनेचे संस्थापक सुहास घोलप म्हणाले की,करमाळा तालुक्यात अवैध धंदे जोमात चालू असून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निवेदनाद्वारे वरिष्ठांना कळवून सुद्धा काहीही कारवाई न झाल्याने करमाळा तहसिल कार्यालय येथे करमाळा तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,वंदे मातरम् शक्ती सेनेचे सुहास घोलप,माजी सभापती शेखर गाडे,जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे,राष्ट्रीय मानवाधिकारचे राज्य संपर्क प्रमुख शामराव ननवरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, दिनेश माळवे,युवा तालुका अध्यक्ष अमोल घुमरे, सोगावचे सरपंच राहुल घनवट,
चिखलठाण चे उपसरपंच दादासाहेब सरडे,करमाळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नितीन घोडेगावकर,ब्राम्हण संघाचे तालुकाध्यक्ष संजय कुलकर्णी, सराफ संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र वाशिंबेकर आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शवला.
यावेळी अधिक माहिती देताना भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यात मटका ,गुटखा, वाळू ,जुगार, चक्री, मावा ,बनावट दारू, बेकायदेशीर लॉजिंग, वेश्याव्यवसाय आदी सर्व बेकायदेशीर अवैध धंदे जोमाने सुरू असून काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सदर धंदे करणाऱ्या लोकांना वरदहस्त असून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून माया गोळा केली जात आहे. त्याच बरोबर करमाळा पोलीस ठाणे येथे आर्थिक प्राप्ती करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाणही वाढले आहे, तसेच सर्वसामान्य जनतेस पोलीस ठाण्यात गेले असता लज्जास्पद ,अपमानास्पद वागणूक देऊन धमकिवजा भाषा वापरली जाते .त्याच बरोबर या त्यांच्या अन्यायाबद्दल आवाज उठवला असता असे धंदे करणाऱ्यांकडून दमबाजी, जिवे मारण्याची धमकी दिली जाते .तसेच अधिकाऱ्यांकडून कायद्यांच्या बडगा दाखवून कोणत्याहि खोट्या गुन्हात अडकवून त्रास दिला जाईल,धिंड काढली जाईल मारहाण केली जाईल ,अशी धमकी दिली जात असल्याचे बोलले जाते.
या सर्व प्रकारास पायबंद बसावा व तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा या भूमिकेतून हे आंदोलन छेडण्यात आले आहे.. सदर सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना पाठीशी घालणारे व धमकी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खातेनिहाय चौकशी करून दोषींवर कारवाई करून कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे चिवटे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा