*बुधचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या प्रयत्नाला यश*
आता बुध ग्रामपंचायत कायम उजेडात
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
राजकारणात समाजकारणाची आस असणार्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते असे म्हटल्यास वावगे ठरत नाही.आणि असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या लोकनियुक्त सरपंच यांनी केलेल्या पारेषण मुक्त ग्रामपंचायत या कामाची प्रशंसा आज खटाव तालुक्यात होत आहे.
खटाव तालुक्यातील बुध गावच्या ग्रामसचिवालय इमारतीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, भु-संपादन विभागाची कार्यालये, गाळे तसेच गावकामगार तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय आहेत. या सर्व कार्यालयाचे लाईट बील महिना अखेरीस ३-४ हजारांवर येत असे. तसेच ग्रामीण भागात लोडशेडिंगचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे लोकांना सरकारी दाखले मिळण्यास विलंब होत असे यावर उपाय म्हणून सरपंच अभयसिंह राजेघाटगे आणि बुध गावचे सुपुत्र व महाराष्ट्राचे वित्त विभागाचे उपसचिव वैभव राजेघाटगे याच्या संयुक्त प्रयत्नाने उर्जा विभाग अंतर्गत सौर ऊर्जाचे युनिट बसविण्यात आले आहे.MEDA अंतर्गत या योजनेनुसार ५ KW क्षमता असलेला ५ लक्ष रू किंमतीचे हे युनिट १००टक्के अनुदानित आहे.यामुळे ग्रामपंचायतीचा वार्षिक साठ हजार फायदा झाला आहे.तसेच सौर ऊर्जा ही एक शाश्वत उर्जा असल्यामुळे नागरिकांना दाखले व अन्य कामांसाठी आता लाईट वाट पाहत बसावे लागणार नाही.कारण आता बुध ग्रामपंचायत कायम उजेडात राहणार आहे.
या कामासाठी सरपंच श्री.अभयसिंह राजेघाटगे,उपसरपंच सौं . मनिषा कुभांर, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले असून त्यांचे कौतुक संपूर्ण खटाव तालुक्यात होत आहे कारण बुध ग्रामपंचायत ही खटाव तालुक्यातील पहिलीच पारेषणमुक्त ग्रामपंचायत आहे.
तसेच यापुढील काळात बुध गावासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयलशील राहणार असल्याचे सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी सांगितले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा