*बेजबाबदार नागरिकांच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाढतोय कोरोना*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. यामुळे मिनी लॉकडाऊन जाहिर झाले आहे. सध्या लॉकडाऊन हे कोणालाच परवडण्यासारखे नाही. हे सर्वांना माहित असताना देखील नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत तर प्रशासन याकडे डोळेझाक करून कामात हलगर्जीपणा करत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसापासून खटाव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. याला मुख्य कारण म्हणजे नागरिकांचा बेजबाबदारपणाच आहे. लॉकडाऊन करण्याला सर्वांचा विरोध आहे. मात्र जबाबदारी कोणालाही नको आहे. आजही अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी विना मास्क मोठ्या प्रमाणात गर्दी करून उभे असतात. काही तंबाखु, गुटखा बहाद्दर तर सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ खाऊन खुशाल पिचकाऱ्या मारत उभे असतात. ज्या प्रशासनाला विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत त्या प्रशासनातीलच अनेक अधिकारी, कर्मचारी विना मास्क असल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे. लॉकडाऊन पासून सुटका तर सर्वांना हवी आहे पण जबाबदारी नको अशी नागरिकांची मानसिकता आहे.
खटाव तालुक्यात व वडूज शहर परिसरात जे बाधित आढळले आहेत जे होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांच्यावर नियत्रंण कोणाचेच नाही. ते खरंच घरात आयसोलेशनमध्ये आहेत का ? आपला व्यापार, धंदा करत बसलेत किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत याची प्रशासनाने नोंद घेणे आवश्यक आहे. परंतु असे होताना दिसत नाही. सध्या परिसर कन्टेन्मेंट झोन करणे बंद असल्याने शेजाऱ्यांनाही याची माहिती नसते. त्यामुळे हे बाधित रूग्ण अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसतात. यामुळे धोका अधिक बळाविण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने फक्त कागदोपत्री सोपस्कार करून चालणार नाही तर या लोकांवर निरीक्षण व वचक सुध्दा असणे गरजेचे आहे. असे हे बेजबाबदार लोक स्वःताबरोबर इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात. हे समाजात सुपरस्प्रेडर म्हणून वावरत असतात. अशा बेजबाबदार लोकांवर कारवाई होणे अपेक्षीत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून कोरोना बाबतचे सर्व नियम पाळल्यास कोरोनाचा प्रादूर्भावही रोखला जाईल. आणि लॉकडाऊन पासून सर्वांचीच सुटका होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा