*रानडुकरांच्या उपद्रवामुळे द्राक्ष बागेचे नुकसान*
तुळजापूर प्रतिनिधी/ रुपेश डोलारे उस्मानाबाद
तामलवाडी,दि.३ :
हवामान बदलामुळे आधीच पिकांना फटका बसत असताना आत्ता रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी यशवंत नरहर कुलकर्णी यांनी दोन महिण्यांपूर्वी गट क्रमांक 631 मध्ये दोन एकर द्राक्ष बागेची नव्याने लागवड केली होती. सोमवार दि.1 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रानडुकराच्या कळपांनी बागेत धुडगूस घालत लागवड केलेली द्राक्ष बाग एका रात्रीत उद्ध्वस्त केली. यामध्ये द्राक्षबागेच्या झाडांसह ड्रीप संचाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून संबंधित विभागाने तत्काळ घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे. गतवर्षापासून सावरगाव शिवारात रानडुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत जात असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. रानडुकरांचे कळप शेत-शिवारात फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हरणांपेक्षा रानडुक्करांची संख्या वेगाने वाढत आहे. दिवसभर दृष्टीस न पडणारी रानडुकरे रात्रीच्या वेळी कळपाने बाहेर पडतात. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची काढणी सुरु असून शेतकऱ्यांनी काढून टाकलेल्या ज्वारीची नासधुस रानडुकरे करत आहेत. शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून जोपासलेली पिके भुईसपाट होताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा