माझ्या दिव्यांग व शिक्षक बांधवावरील कोरोना विषाणूंचे संकट दूर व्हावे यासाठी रोजा धरणार - राजेंद्र लाड
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई (प्रतिनिधी):- हिंदू,मुस्लिम,शिख,इसाई....हम सब भाई - भाई असे नुसते बोलून चालणार नाही तर प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असतात.प्रत्येक धर्माच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते.तसेच प्रत्येक धर्माच्या सणामधून वेगवेगळे संदेश दिले जात असतात.सणामुळे एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या सणाला शुभेच्छा देत असतात.नव्हे नव्हे तर एकमेकांच्या सुख - दुखाःत सामील होत असतात.याच विचारांचा आधार घेवून माझ्या दिव्यांग व शिक्षक बांधवावरील सध्याचे कोरोना विषाणूंचे संकट लवकरच दूर होवून भविष्यात चांगले दिवस यावेत व दिव्यांग हक्क कायदा २०१६ ची राज्यात कडक अंमलबजावणी व्हावी,दिव्यांगांच्या व शिक्षकांच्या सध्याच्या लाँकडाऊन काळातील अडीअडचणी दूर व्हाव्यात,दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाजाकडून व शासनाकडून सोयी - सवलती मिळाव्यात या उद्दात हेतुने इस्लाम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यामध्ये दिव्यांगाप्रती व शिक्षकांप्रती आदर ठेवून व मनोमन भावना घेवून अल्लाह यांना दुवा मागण्यासाठी सालाबादप्रमाणे गुरुवार व शुक्रवार दिनांक २९ व ३० एप्रिल २०२१ रोजी दोन दिवसाचा रोजा धरणार आहे.अशी माहिती शासन मान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी दिली आहे.
शाळेमध्ये शिक्षक मुलांना सर्वधर्म समभाव यांची शिकवण देत असतात.पण तिचा प्रत्यक्षात किती प्रमाणात अवलंब केला जातो हे ज्यांच्या - त्यांच्या शिकवणीवर अवलंबून असते.पण खऱ्याअर्थाने सर्वधर्म समभाव ही मोठमोठाली शब्द वापरुन चालणार नाही तर त्याची स्वतः पासून अंमलबजावणी करणे अभिप्रेत असते.त्यामुळेच मी स्वतः शिक्षक या नात्याने सर्वधर्माच्या सणामध्ये प्रत्यक्ष सामील होत असतोच.तसेच प्रत्येक धर्मामध्ये संस्काराला खुप महत्त्व असते.कोणताही धर्म वाईट विचार सांगत नसून भारतातील सर्व धर्माच्या सणाला खुपच महत्त्व असून त्यातून खऱ्याअर्थाने संस्कार,आचार - विचार,चांगले - वाईट यांची शिकवण दिली जात असते.
याचप्रमाणे सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना चालू असून रमजान ला इस्लाम धर्मात फारच मोठे स्थान दिलेले असून इस्लाम धर्मानुसार रमजान महिन्यात रोजा धरल्यामुळे आत्मा पवित्र होत असतो व अध्यात्मिक तसेच शारीरिक रुप शुद्ध होत असते.यातून संयम,प्रेम,अनुशासन यांची रुजवणूक होत असते.यामुळेच मुस्लिम बांधव सध्या दिवसभर उपवास करत असतात व अल्लाह यांना दुवा मागत असतात.
त्यामुळेच मुस्लिम बांधवांच्या या पवित्र महिन्यातील उपवासात आपणही सामील झाले पाहिजे याच एका विचाराने मी स्वतः दिव्यांग व शिक्षक बांधवांना चांगले दिवस यावेत यासाठी व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी दोन दिवसाचा सालाबादप्रमाणेच रोजा धरणार आहे.या दोन दिवासाच्या उपवासाच्या काळात दिव्यांग व गरीब व्यक्तींना तन,मन,धनाने मदतही करणार आहे.असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा