कारखानदारीच्या नफ्यातुन ऊस वाहतूक दारांचे कमिशन वाढवा : खुपसे पाटील
* तोंडले येथे 'जनशक्ती'ची बैठक
प्रतिनिधी/वेळापूर
जर राज्यातील अथवा देशातील कारखानदारी अडचणीत आली असेल तर एका कारखान्यावर तीन - चार कारखाने उभे राहिलेच कसे हा संशोधनाचा विषय असला तरी कारखानदारी अडचणीत आहे म्हणणाऱ्या कारखानदारांकडे कोट्यवधींच्या गाड्या येतातच कोठून असा सवाल करत ज्या ट्रॅक्टर व ट्रक चालक मालकांमुळे आपला कारखाना चालतो त्यांचे वाहतूक कमिशन कारखानदारीच्या नफ्यातून वाढविले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे पाटील यांनी केला.
तोंडले (ता.माळशिरस) येथे ऊस वाहतूक दर यांच्या प्रश्नासंबंधी जनशक्ती संघटनेची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राजेभाऊ बिले, तानाजी जाधव, माधव चव्हाण, संतोष चव्हाण, बिभीषण गमे, मनोज चव्हाण, सुनील टिक, स्वप्निल बेले, पप्पू पवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते. आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादम सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. काही लोकांनी आत्महत्या सारखा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आपण वेळीच एकत्र होऊन कारखानदारांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे. यासाठी २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर आंदोलनात सामील होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी स्वप्नील चव्हाण, प्रवीण तारे देशमुख, मोहन चव्हाण, सचिन टिक, सागर माने, तुकाराम सुरवसे, अजित कोडक, वैभव मस्के, रोहन नाईकनवरे, अकुश उपाळे, गणेश ढोबळे, राणा वाघमारे यांच्यासह इतर वाहन चालक मालक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा