भुरकवडी - येथे ऊर्किउयात कांदा भरताना शेतकरी संदिप देशमुख व सचिन देशमुख
कांद्याला दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
सध्या खटाव तालुक्यात बहुतांशी गावात लोणंद कांदा हे पीक घेतले जात असते. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याला योग्य दर नसल्यामुळे तसेच हवामान बदलामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे कांद्याचे उत्पादनात घट झाली आहे. मोठ्या आशेने केलेल्या कांदा पिकातून फायदा होण्या ऐवजी शेतकऱ्याला आर्थिक नुकसानच सहन करावे लागत आहे .
सध्या खटाव तालुक्यातील भुरकवडीच्या माळरानावर अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कांद्याची पसर केलेली आहे. दरवर्षी या कांद्याला जास्तीचा दर मिळत असल्यामुळे बरेच शेतकरी या कांद्याची लागवड करतात. गेल्यावर्षी या कांद्याला 20 ते 30 रुपये प्रति किलोचा दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी होता .परंतु चालू वर्षी या कांद्याला जागेवर कांदा पाहून ५ ते १० रुपये प्रति किलो असा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मूळ भांडवल तर सोडाच हाती काहीच रकम मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानातील बदलामुळे आधीच शेतकरी त्रस्त झाला असताना कांद्यावर पडलेल्या रोगामुळे औषधे फवारणी आदींचा खर्च पाहता शेतकऱ्याला दरवर्षी पेक्षा उत्पादन कमी निघत असल्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे .
भुरकवडी च्या माळरानावर कांद्याची पसर शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु सध्या वातावरणात बदल होत असून पावसाळी वातावरणामुळे कांदा सुकण्याऐवजी हा कांदा खराब होत आहे. त्या मुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तर कांदयाला दर नसल्यामुळे व्यापारी फिरकत नाहीत. या मुळे अनेक शेतकऱ्यांनी भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी ऊर्किड्यामध्ये भरला आहे .
एका एकर क्षेत्रात १५० ते २०० पिशव्या निघणाऱ्या शेतात ५० ते ६० पिशव्या निघत आहेत. कमी निघणाऱ्या मालामुळे तसेच हवामानातील बदलामुळे कांदे व्यवस्थित पोसले गेले नाहीत. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जेवढे भांडवल घातले आहे ते सुद्धा निघणे कठीण झाले आहे. एकरी ५० हजार रुपये खर्च या कांद्यासाठी येत असून या वर्षीच्या दरामुळे अत्यंत बिकट परिस्थितीची शेतकऱ्यावर वेळ आली आहे. कांद्याला दर नसल्यामुळे भुरकवडी येथे माळरानावर टाकलेला कांदा काही शेतकऱ्यांनी जागेवर सोडून दिला आहे तर काही शेतकऱ्यांनी ऊर्किड्यामध्ये भरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा