स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एफआरपीसाठी साखर कारखान्यावर रॅली
ऊसाची पहिली उचल एकरकमी जाहीर करण्याची मागणी
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
चालू गाळप हंगामातील ऊसाची एफआरपी एकरकमी जाहीर करावी आणि गेल्या हंगामातील ऊसाचे अंतिम बिल १ ५० रुपये तातडीने दयावे या मागणीसाठी खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून एकरकमी एफआरपीची घोषणा केली नाही तर कारखाने आणि ऊसतोडी बंद पाडल्या जातील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना यावर्षीची ऊसाची एफआरपी तीन तुकड्यात देण्याचा घाट घातला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ ऑक्टोबर ला झालेल्या जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत एफआरपी तीन तुकड्यात देण्याचा डाव हाणून पाडण्याचा इशारा दिला त्यांनतर कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री, शाहूसह ९ साखर कारखान्यांनी जवळपास ३००० रुपयाच्या आसपास आपाआपल्या एकरकमी एफआरपी जाहीर केल्या आहेत. तिकडे कोल्हापूरात जे शक्य झाले ते आपल्याकडे का होत नाही, असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यातील साखर कारखान्यावर धडक मोर्चाचे नियोजन केले आहे. गेल्या हंगामातील शिल्लक राहिलेला १५० रुपये अंतिम बिल रक्कम तातडीने द्या आणि यावर्षीची एफ आर पी एकरकमी ऊस तुटून गेल्यावर १४ दिवसात जमा करावी व कुठल्याही परिस्थितीत तुकड्या तुकड्याची एफ आर पी चालणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सातारा जिल्ह्यातील असताना एफ आर पीचा कायदा पाळा हे आम्हाला सांगावे लागते आहे याच्या पेक्षा दुर्देव काय?असा सवालही संघटनेने केला आहे. इथेनॉलचे दर वाढल्यामुळे अनेक कारखाने साखरेऐवजी इथेनॉलकडे वळतील त्यामूळे रिकवरीचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. परिणामी एफ आर पी मध्ये घट होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी एफ आर पी बाबत तडजोड न करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
ऊसतोड करताना उसतोडणी कामगार शेतकऱ्याकडून वाढ्यापोटी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी करतायत. याबाबत ही कारखाना व्यवस्थापनाने लक्ष घातले नाही तर संघटनेच्या वतीने ऊस तोड कामगार आणि स्लीपबॉय यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. त्या अन्यायाविरोधात मोटरसायकल रॅली काढून निवेदन दिले जाणार आहे. बुधवार २७ रोजी सकाळी १० वाजता पडळ कारखाना, ११ वाजता गोपूज , १२ वाजता वर्धन अग्रो तर दुपारी २ वाजता डोंगराई रायगाव साखर कारखान्यावर होणार आहे.
तरी या रॅलीत मोठ्या संख्येने शेतकरी बंधूंनी सहभागी व्हावे व आपल्या हितासाठी राजकारण, गट, तट बाजूला सारून शेतकरी हाच पक्ष मानून उपस्थित राहण्याचे आवाहनही संघटनेने केले आहे. या निवेदनावर राज्य प्रवक्ते अनिल पवार, पक्ष अध्यक्ष श्रीकांत लावंड, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत भुजबळ मामा,
युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख तालुका अध्यक्ष दत्तू काका घार्गे, पक्षाचे तालुका अध्यक्ष ऍड. प्रमोद देवकर, युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार यांच्यासह विखळे, भुरकवडी, चितळी, वाकेश्वर, गोपूज, पेडगाव, वडूज, अंबवडे, अंभेेेरी, गणेशवाडीसह परिसरातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री पवार यांनी दिलीआहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा