नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस उत्पादक सभासदांना १५ कोटी २५ लाख रुपयांचा दणका - केशवराव मगर
श्रीगोंदा-नितीन रोही
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२०-२०२१ च्या बॉयलर प्रदीपन व गळीत हंगाम सुरू करण्याच्या कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी बोट वर करून आपल्या कारखान्याची एफ.आर.पी. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २६६१/- रुपये आहे व आपण नगर जिल्ह्यात एक नंबरचा भाव देणार म्हणून घोषणा केली. परंतु २०१९-२० गळीत हंगामात कारखाना बंद असण्याच्या नावाखाली आपल्या कारखान्याने एफ.आर.पी. कमी करण्यासाठी शासनाकडे मागणी केली व ती कमी करून घेतली. यामुळे शेतकरी सभासदांचे १५ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक केशवभाऊ मगर यांनी दिली. आजच कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एफ.आर.पी. प्रमाणे राहिलेले १४४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती दिली. कारखान्याची एफ.आर.पी. २६६१/- रुपये होत असताना ती कमी करून सभासदांचे २१७ रुपये प्रतिटनाने नुकसान केले परंतु कारखाण्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून स्वतःची खाजगी मालमत्ता व खाजगी कंपन्या वाढवल्याची घणाघाती टिका मगर यांनी केली. मगर यांनी राजेंद्र नागवडे यांना सवाल केला की आपण सांगता आपला कारखाना नफ्यात आहे, आपल्याला बँक अजून विनातारण १२० कोटी कर्ज देऊ शकते. मग गेली दोन वर्ष सभासद कोरोना मुळे अडचणीत असताना त्यांना मदत करण्याचे सोडून त्यांच्याच हक्काचे पैसे का कमी केले ? कर्मचाऱ्यांचे पगार व वाहतुकदारांचे पैसे का थकविले?
पुणे, कोल्हापूर, नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा 100 ते 300 रुपये पर्यंत जास्त भाव देण्याचे काम केले. निवडणूक काळात जर आपण एवढा कमी भाव देत असाल तर या निवडणूकीत सभासद तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या कारखान्याला जर आणखी १२० कोटी रुपये कर्ज मिळू शकते तर त्याच्या पैकी फक्त १५ कोटी कर्ज काढून एफ.आर.पी. प्रमाणे भाव दिला असता तर चालू हंगामात जास्त गळीत होऊन आपण कर्ज फेडू शकलो असतो. परंतु भाव कमी दिल्यामुळे त्याचा गळीतावर सुद्धा परिणाम होऊन तोटा वाढू शकतो अशी माहिती मगर यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा