*उस्मानाबाद तालुक्यातील वसुलीसाठी विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा केला बंद*
उस्मानाबाद तालुक्यामध्ये वसुलीसाठी महावितरण ने विद्युत रोहित्र बंद केले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता,परंतु मध्येच एक ते दीड महिना पावसाने दडी मारली त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला होता. तसेच कशीबशी खरीप हंगामातील आलेल्या पिकाची काढणी चालू असतानाच सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस व ऑक्टोबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुद्धा हिरावून घेतला होता. त्या दुःखातून कसाबसा शेतकरी सावरत रब्बी हंगामाची पेरणी केली परंतु रब्बी हंगामातील प्रमुख पिकांना गहू,हरभरा,ज्वारी यांना पाणी देण्यासाठी आता कुठे शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. तो पर्यंत वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज बंद करून वीज बिलाची वसुली सुरू करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.खरीप हंगाम तर पावसाने वाहून गेला परंतु वीज कनेक्शन बंद झाल्यामुळे रब्बी हंगाम पण वाया जातो की काय? अश्या संभ्रमात शेतकरी राजा सापडला आहे. तसेच वरून शेतकऱ्यांना शासनाने एका हाताने तुटपुंजी मदत करून दुसरीकडे त्या मदतीच्या दुप्पट वसुली सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे आपला देश कृषिप्रधान देश असून सुद्धा याच कृषिप्रधान देशामध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजाला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.तरी याकडे शासनाने लक्ष घालून वीज तोडणी थांबवून शेतकऱ्यांना जीवदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा