Breaking

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

ब्रह्मकुमारी केंद्रातील आध्यात्मिक ज्ञानामुळे प्रपंच आणि परमार्थाची यशस्वी सांगड घालता येते... धनराजदादा शिंदे



ब्रह्मकुमारी केंद्रातील आध्यात्मिक ज्ञानामुळे प्रपंच आणि परमार्थाची  यशस्वी सांगड घालता येते... धनराजदादा शिंदे


 बेंबळे। प्रतिनिधी।          

                  मानवी जीवन व्यतीत करत असताना सखोल आणि वस्तुनिष्ठ आध्यात्मिक ज्ञानाची नितांत आवश्यकता आहे व तरच यशस्वी, समाधानी व सफलतापूर्वक जीवन व्यतीत करता येते.  प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या देश आणि विदेशातील प्रत्येक केंद्रांमधून राजयोगाच्या माध्यमातून  आध्यात्मिक  ज्ञानाचे अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिले जाते व या राजयोग आणि येथील ज्ञानाच्या आधारावर प्रत्येक मनुष्यप्राण्याला प्रपंच आणि परमार्था ची यशस्वी सांगड घालून उत्कृष्ट आणि आदर्श जीवन व्यतीत करता येते  व म्हणूनच या संस्थेच्या टेंभुर्णी शाखेने आयोजित केलेल्या किसान सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम म्हणजे

 अभिमानास्पद,गौरवशाली व अभिनंदनीय बाब आहे, असे प्रतिपादन माढा तालुका पंचायत समिती सदस्य व माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजदादा शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रीय किसान दिनाच्या औचित्याने प्रजापिता ब्रह्माकुमारी केंद्राच्या टेंभुर्णी शाखेच्या वतीने किसान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी धनराज शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करत होते .या कार्यक्रमास ब्रह्माकुमारी आध्यात्मिक संस्थेच्या सोलापूर झोनच्या प्रमुख राजयोगिनी सोमप्रभा बेहेनजी, माढा तालुका कृषी अधिकारी बी डी कदम, तुलसीभाई, संगीता बेहेन, शिवरात्रि बेहेन, उज्वला बेहेन आणि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
         सर्वप्रथम टेंभुर्णी केंद्राच्या संचालिका अनिता बेहेनजी यांनी सर्वांचे स्वागत केले . मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, उपस्थितांना भगवे फेटे बांधून त्यांचा यथोचित सन्मान केला व मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला . याप्रसंगी मार्गदर्शन करताना सोलापूर झोनच्या प्रमुख राजयोगिनी सोमप्रभा बेहेन जी म्हणाल्या की शेतकऱ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे ,शेती करताना अध्यात्मिक ज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच एकाग्रचित्ताने शेतीमधील यश-अपयश ,नफा- तोटा याविषयी सकारात्मक विचार सुचतील व केलेले कष्ट सत्कारणी लागतील, कितीही कठीण प्रसंग आला तरी शेतकरी बंधूनी आत्महत्या करण्याचा विचार कधीही मनात आणता कामा नये. कृषी अधिकारी बि डी कदम याप्रसंगी म्हणाले की 1972 नंतर सर्वत्र रासायनिक शेतीच्या प्रयोगामुळे आज शेती  विषासारखी बनली आहे म्हणून सध्या सरकारने सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी आणलेल्या विविध योजनांचा शेतकरी बंधूनी मनापासून लाभ घ्यावा. यावेळी तुलशीभाई ,संगीता बेहेन, उज्वला बेहेन व शिवरात्रि बेहेन यांनीही समयोचित विचार व्यक्त केले .सकारात्मक विचार ,अपयशाने खचून न जाणे, पिकांची जोपासना करताना राजयोगाचे अध्ययन करणे,  आदी विषयावर मान्यवरांनी सखोल विचार व्यक्त केले.
 या कार्यक्रमास टेंभूर्णी, बेंबळे ,शिराळ ,भिमानगर, सोलापूर ,बार्शी, कुर्डुवाडी ,अकलूज, पंढरपूर आदी ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टेंभूर्णी, बेंबळे व परिसरातील परिवारानी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोदावरी बेहेनजी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिता बेहेनजी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा