Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे हाल! शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान*


*अवकाळी पावसाने ऊसतोड मजुरांचे हाल! शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान*



माढा तालुका प्रतिनिधी/ भारत जगताप यास कडून


सध्या उसतोडणीचा हंगाम सुरु असुन माढा तालुक्यात विठ्ठलराव शिंदे , भैरवनाथ, कूर्मदास, विठ्ठल शुगर, आष्टी शुगर, नीरा-भीमा ,  बारामती अग्रो या कारखान्याचे हजारो उसतोड मजुर दाखल झाले असून वाड्यावस्त्यावरील मोकळ्या जागेत कोपट्या करून आपल्या महिला पोरांबाळासहीत राहत आहेत. या मजुरांना आवकाळी पावसाचा तडखा बसला असून लहान मुलं थंडीने गारठून गेली आहेत. कोप्यात पाणी शिरल्याने अनेकांचे अन्नधान्य भिजुन गेले आहे. हातावर पोठ असलेल्या या मजुरांना संबंधित कारखान्याने चांगल्या प्रतीची ताडपत्री, बाबुं, लहान मुलांना स्वेटर, ब्लँकेट्स उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

आज अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी उसतोड मजुरांच्या कोप्यात पाणी शिरल्याचे व संसार उघड्यावर पडल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, त्यांना कोणतीही मदत होताना दिसत नाही. त्यामुळे कारखान्यांचे चेअरमन व प्रशासन यांनी ऊसतोड मजुरांना मदत करण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे 

गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरण ने वीज बिल वसुलीसाठी वाड्यावस्त्यावरील लाईट कट केल्याने या उसतोड मजुरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती व आज अचानक झालेल्या अवकाळी पावसाने त्यांना झोडपल्याने सुलतानी व आस्मानी अशा दुहेरी संकटाचा सामना उसतोड मजुरांना करावा लागला आहे.

उसतोड मजुरा बरोबरच शेतकऱ्यांना देखील या पावसाचा प्रचंड फटका बसला आहे. ऊसाच्या फडात चिखल होत असल्याने ट्रॅक्टर किंवा ट्रक फडात जात नसल्याने उसतोड मजुरांना जास्तीची वाहतूक द्यावी लागत आहे. तसेच शेतीपासून मुख्य रस्त्यावर वाहने येई पर्यंत दोन ते तीन ठिकाणी वाहने चिखलात रुतुन बसत असल्याने रुतलेली वाहने बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना दुसरा ट्रॅक्टर किंवा जेसीबी पाचारण करावा लागत आहे. यासाठी ट्रॅक्टरला एक हजार तर जेसीबी साठी दोन हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे.

ज्वारीच्या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार असला तरी तुरी, फळबागांना मात्र मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांत ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा