महाड औद्योगिक क्षेत्रात वाहतूक नियोजनाचा अभाव रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांचे पार्किंग
कंपन्यांचे वाहन पार्किंग कडे दुर्लक्ष
महाड प्रतिनिधी – मिलिंद माने
महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत येणारी अवजड वाहने औद्योगिक परिसरातील रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महाड औद्योगिक क्षेत्राला ट्रक टर्मिनल ची आवश्यकता आहे मात्र या समस्येकडे एम.आय.डी.सी. प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
महाड एम.आय.डी.सी. मध्ये असलेल्या कारखान्यातील मालाची आवक जावक करण्यासाठी विविध ठिकाणाहून ट्रक, टँकर, ट्रॉली, क्रेन आणि इतर अवजड वाहने ये - जा करत असतात. कारखान्यातील वाहतूक करण्यासाठी आलेली वाहने कंपनीच्या आवारात उभी केली जात नाहीत. कंपनीच्या आवाराबाहेर रस्त्यालगत हि वाहने उभी केली जात असल्याने एम.आय.डी.सी. मधील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीस कायम अडथळा निर्माण होत आहे. यातील कांही वाहने हि मुंबई गोवा महामार्गावर नडगाव गावाजवळ दुतर्फा उभी केली जातात. यामुळे याठिकाणी औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना अवजड वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. हीच स्थिती नांगलवाडी फाटा ते महाड औद्योगिक पोलीस ठाण्यापर्यंत दिसून येत आहे. महाड नांगलवाडी ते एम.आय.डी.सी. हा मार्ग संपूर्णपणे या अवजड वाहनांनी व्यापलेला आहे. प्रमुख मार्गावरील सुदर्शन केमिकल, हायकल, प्रीव्ही ऑरगॅनिक, कोप्रान, या कंपन्यांच्या समोर अवजड वाहने कायम उभी असतात. आसनपोई गावाकडे जाणाऱ्या मार्गावर आणि जिते गावाकडे जाणाऱ्या धारिया इमेप्क्स, टायटन, कुसगाव गावाच्या मार्गावर एम्बायो, अनंत ओर्गानिक्स, इफ्का, या कंपन्यांच्या समोर कायम अवजड वाहने उभी असल्याने स्थानिक ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून औद्योगिक क्षेत्र विकसित करताना कारखान्यांना सोयीसुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र आजही अनेक सुविधा केवळ कागदावर राहिल्या आहेत. यातील ट्रक टर्मिनल करिता सातत्याने मागणी केली जात आहे. रस्त्यावर अवजड वाहनांमुळे अपघात होण्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस देखील अडथला निर्माण होत आहे. यामुळे कंपन्यांनी कंपन्याच्या आवारात अवजड वाहने पार्क करण्याबाबत सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. मात्र कंपन्यांच्या आवारात असलेली जागेची मर्यादा आणि वाहनांची संख्या अधिक असल्याने हे ट्रक बाहेर उभे केले जातात. महाड बिरवाडी आणि पुढे जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थाच्या प्रवासी वाहनांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाड मधून बिरवाडी आणि परिसरात एस.टी. वाहतूक, रिक्षा, आणि इतर वाहनांची कायम वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथला निर्माण होत आहे.
ट्रक टर्मिनल करिता महाड एम.आय.डी. मध्ये अग्निशमन दलाच्या जवळच एक प्लॉट १९९९ मध्ये विकसित करण्यात आला होता. मात्र हा प्लॉट एका कंपनीला देण्यात आला. २१२०० चौरस मीटरचा भूखंड क्रमांक आर ७ तर शेजारील ६००० चौरस मीटरचा मोकळा प्लॉट हा प्लॉट इंडिया पॉवर पार्टनर्स या कंपनीला देण्यात आला होता. मात्र १२/०४/२०१७ रोजी हा प्लॉट ट्रक टर्मिनल करिता हस्तांतर करण्याची विनंती एम.आय.डी.सी. ने केली आहे. ट्रक टर्मिनल करिता राखीव प्लॉट ट्रक टर्मिनलला प्राधान्य न देता हा प्लॉट खाजगी कंपनीला कसा दिला हा प्रश्नच आहे. सद्या हा प्लॉट देखील या कंपनीने परत केल्याचे एम.आय.डी.सी.अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी आज देखील याच प्लॉटवर कांही ट्रक पार्क केले जात आहेत. यातील बहुतांश हे जवळील एका कंपनीचेच ट्रक उभे केले जात आहेत.
जिते मार्गावर असलेल्या कंपन्यांचे विशेषतः धारिया इम्पेक्स, प्रीव्ही, आणि पुढे टायटन कंपनीचे अवजड ट्रक रस्त्यावर उभे केले जात असल्याने वाहनांमुळे अपघाताची शक्यता आहे. याबाबत स्थानिक एम.आय.डी.सी.आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे – अमजद काझी, स्थानिक नागरिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा