खाजगी शाळातील फी वर शिक्षण विभागाने अंकुश ठेवावा ::ग्राहक कल्याणची मागणी
कोल्हापूर,दि.२४(प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली खाजगी शाळांचे अक्षरशः पेव फुटले असून येथील फी वर शिक्षण विभागाने अंकुश ठेवावा अशी मागणी सातारा जिल्हा ग्राहक कल्याण फाऊंडेशनने ने केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील,संघटक जयदीप ठुसे व सचिव प्रा.नागनाथ स्वामी म्हणाले," जिल्ह्यात सद्या इंग्रजी,मराठी माध्यमांच्या लहान गट ते उच्च माध्यमिक वर्गांच्या अनेक शाळा आहेत,या शाळांच्या रंगीबेरंगी आकर्षक जाहिराती वाचून पालक दर्जेदार शिक्षणाच्या अपेक्षेने या शाळेत आपल्या पाल्यांना
प्रवेश घेतात.अनेक शाळात जाहिरातीत दाखविलेल्या बाबी प्रत्यक्षात नसतात, प्रवेश घेताना फी बाबतही असाच गोंधळ असतो.प्रत्येक शाळेची फी ही प्रवेश घेई पर्यंत समजत नाही.जाहिरातीत फीचा उल्लेख नसतो.लहान गटाची वार्षिक फी २० - २१ हजारांपासून घेतली जाते.गणवेश व शालेय पुस्तके,साहित्य यांचा खर्च वेगळा असतो.याच प्रमाणात पुढील वर्गांची फी असते. ही फी नेमकी कोणत्या नियमाने व निकषाने आकारली जाते,या बाबत पालकांत संभ्रम आहे.शाळा व्यवस्थापन या बाबत नेमके व स्पष्टपणे काहीही सांगत नाही.तसेच विद्यार्थ्यांना लागणारे गणवेश ,शूज, शैक्षणिक साहित्य ,शासनाची मान्यता नसलेली गाईड्स, व्यवसाय माला शाळेने ठरवून दिलेल्या दुकानातूनच घेण्याचा आग्रह केला जातो, त्यामुळे पालकात प्रचंड संतप्त भावना आहे.
या शिवाय काही शाळांतून प्राथमिक स्तरावर प्रवेश परीक्षाही घेतली जात असल्याची पालकांत चर्चा आहे,शिक्षण हक्क कायद्या नुसार प्राथमिक स्तरावर प्रवेश परीक्षा घेता येत नाही.
या सर्व बाबींची गंभीर दखल जिल्हा शिक्षण विभागाने घेऊन शाळांच्या फी वर नियंत्रण ठेवावे,तसेच शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची माहिती घेऊन त्यांना समज दयावी,त्यांच्यावर कडक करावाई करावी अशी मागणी ग्राहक कल्याण ने केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा