कटगूणच्या मलंगबाबा दर्गाहचा गुरुवारपासून उरुस
वडूज प्रतिनिधी शरद कदम/
खटाव तालुक्यातील कटगूण येथील हजरत मलंगबाबा दर्गाहचा उरुस येत्या गुरुवार दि. १२ व १३ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. उरुसानिमित्ताने धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह मानव एकताचे संमेलन तसेच भंडाऱ्याचे आयोजन कऱण्यात आले आहे.
कटगूण येथील हजरत सय्यदशाह जलालउद्दीन कादरी (रहे.) अलमारुफ मोहब्बतशाह मलंग बाबा दर्गाहचा दरवर्षी १२ आणि १३ मे या दरम्यान उरुस साजरा करण्यात येतो. गेल्या ३८ वर्षापासून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागासह आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने मलंगबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत.दर अमावस्येला या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.गुरुवार दि.१२ मे रोजी हजरत मलंगबाबा दर्गाहचा संदलनिमित्ताने खटाव गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्या मिरवणुकीत दर्गाहचे उत्तराधिकारी (मठाधिपती) हजरत रहमानशाह बाबा आणि हजरत शफीक बाबा हे नेतृत्व करणार आहेत. सायंकाळी ५ वाजल्यानंतर खटाव गावातील मुल्ला मशिदीत धार्मिक विधी (फातेहाख्वानी) केल्यानंतर उत्साहात मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर रात्री मिरवणुकीचा सांगता झाल्यानंतर कटगूण येथे हजरत मलंगबाबांच्या समाधीला संदल लावण्याचा विधी हजरत रहमानशाह बाबा यांच्या हस्ते पार पाडण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी १३ मे रोजी दुपारी अखिल भारतीय मानव एकता सेवा समितीच्यावतीने दर्गाहच्या प्रांगणात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सातारा जिल्ह्यासह विविध भागातील धार्मिक गुरु तसेच सामाजिक, राजकीय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या संमेलनात मानव एकतेचा संदेश दिला जाणार आहे. त्यानंतर दर्गाहच्या झेंड्याची मिरवणूक कटगूण गावातून काढण्यात येणार आहे, अशी माहिती दर्गाह समितीचे युन्नूस मुल्ला, सादीक मणेर यांनी दिली.
उरुसनिमित्ताने १३ मे रोजी दिल्ली येथील प्रसिद्ध कव्वाल गायक तय्याब साबरी यांच्या कव्वालीचा कार्यक्रम रात्री आठ वाजता होणार आहे. दोन वर्षापासून करोनाच्या संसर्गामुळे धार्मिक उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. दर्गाहच्या दर्शनासह भंडारा आणि कव्वालीच्या कार्यक्रमासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा