ग्रामसेवकांना खात्याची कामे सोडून इतर विभागाची कामे देऊ नयेत....
ग्रामसेवक संघाची पंचायत राज समीतीकडे मागणी
बेंबळे।प्रतिनिधी
मागील तीन दिवसांपासून पंचायती राज समिती सोलापूर जिल्ह्यात आहे.यावेळी ग्रामसेवकांच्या अतिरिक्त कामासंदर्भात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने पंचायत राज समीतीला निवेदन दिले. ग्रामविकास विभागाची कामे सोडून इतर विभागाची कामे न देण्याबाबत पंचायती राज समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनास शिफारस व्हावी अशी विनंती पंचायत राज समीतीचे अध्यक्ष आ.डॉ.संजय रायमूलकर व समिती सदस्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामविकास विभागाचे सचिव यांच्या साक्षीच्या वेळी सदरच्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे आश्वासन समिती अध्यक्षांनी ग्रामसेवक संघाला दिले. यावेळी ग्रामसेवक संघाचेराज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील व ग्रामसेवक संघ पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ मिटकल, विभागीय सचिव विजयकुमार माढेकर व माढा तालुका सचिव प्रताप गवळी हे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवक संवर्गाला ग्रामविकास विभागाची कामे करून महसूल, कृषी, आरोग्य, वन, गृह इत्यादी विभागाची कामे दिली जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीची कामे अपूर्ण राहुन ग्रामविकासाची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत. याशिवाय विशेष अभियाने दरवर्षी राबविण्यात येतात. त्यामुळे ग्रामसेवकांना अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. यामुळे ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावाखाली असून विविध आजारांनी त्रस्त आहेत. काही जणांनी तर कामाच्या अति तणावामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने होण्यासाठी, ग्रामसेवक संवर्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन ग्रामविकास विभागा व्यतिरिक्त इतर विभागाची कामे ग्रामसेवकांना देण्यात येऊ नयेत अशी शिफारस करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या अतिरिक्त कामासंदर्भात पंचायत राज समीती शासनाला शिफारस करून ग्रामसेवक संवर्गाला न्याय मिळवून देईल असे ग्रामसेवक संघाचे राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटिल यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा