मुस्लिम व्यक्तीची 17 वर्षापासून आषाढी वारी.....
आषाढी एकादशीदिवशी बकरीईद साजरा करू नका ..........मुनसब शेख यांचे आव्हान
बेंबळे।प्रतीनीधी।
बेंबळे परिसरातील माळेगाव (ता. माढा) येथील मुनसब ईमाम शेख हे 44 वर्षाचे मुस्लिम गृहस्थ मागील 17 वर्षापासून बेंबळे येथील संभाजी दिंडी( दिंडी क्र-8) मधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत देहू ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी म्हणून पायी चालत वारी करत आहेत व या वारीच्या माध्यमातून मुनसब शेख हे सर्वधर्मसमभावाचा संदेश सर्वाप्रती पोहोचवत आहेत.
वृत्तांत असा ही बेंबळे( ता. माढा) येथील विठ्ठलभक्त तानाजी सलगर महाराज हे मागील 23 वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत पायी चालत संभाजी दिंडी,( दिंडी क्रमांक आठ) आयोजित करत आहेत. या दिंडीमध्ये बेंबळे, हरीनगर, मिटकलवाडी, शेवरे ,आढेगाव, चांदज, आलेगाव, माळेगाव,शेवरे व परिसरातील लहान मोठ्या वाड्यावस्तीवरील किमान 275 ते 300 स्त्री-पुरुष ,युवक वारकरी सामील झालेले असतात. या दिंडीसोबत माळेगाव येथील मुनसब इमाम शेख हे 44 वर्षाचे गृहस्थ 2003 पासून या दिंडीत सहभागी होत आहेत. मुनसब शेख हे स्वतःच्या मुस्लिम धर्माबरोबरच हिंदू व इतर धर्मियांचाही मनापासून आदर करतात ,आषाढी वारीचा तर मला ध्यास लागलेला आहे असे ते म्हणतात. वारीमध्ये चालत असताना ते डोक्याला फेटा, कपाळाला बुक्का,हातात टाळ, गळ्यात विणा अशा वारकऱ्याच्या पेहरावात चालत असतात, वाटेने ते अभंग म्हणतात, भजन करतात ,पांडुरंगाची नियमित पूजा करतात, कीर्तन ऐकतात व संत तुकाराम महाराजपालखीच्या आरतीला सकाळी व संध्याकाळी नियमित उपस्थित राहून आरती म्हणतात व मंत्र म्हणतात. शेख हे त्यांच्या धर्माचे ईद, रोजे, मोहरम हे सण आनंदाने साजरे करतात, तसेच प्रत्येक महिन्यातील पांडुरंगाच्या एकादशीचा उपवास ही करतात. त्यांनी आतापर्यंत नाशिक, त्रंबकेश्वर, बालाजी, गणपती इत्यादी ठिकाणी आवर्जून जाऊन देवी देवतांचे दर्शन घेतले आहे, तसेच ते हिंदू धर्मीय मित्रांच्या बरोबर कोणत्याही ठिकाणी देवदर्शनास आवर्जून जातात ,त्यांचे सर्व धर्मीय मित्र असून मुस्लिम सणांमध्ये सगळेजण आनंदाने सहभागी होतात.
हिंदूंच्या भावनांचा आदर करा....
पुढील दोन दिवसात बकरीईद साजरा करा...
मुनसब शेख
यावर्षी दहा जूलै रोजी आषाढी एकादशी दिवशी बकरीईद सण आलेला आहे तेव्हा तुम्ही काय सांगू इच्छिता...? असे विचारले असता मुनसब शेख म्हणतात की बकरीईद सण पुढील दोन दिवसात देखील साजरा करता येतो. त्यामुळे हिंदू धर्मीयांच्या पांडुरंगाच्या विषयी असलेल्या पवित्र भावनांचा व आषाढी एकादशीच्या महान पर्वणीचा विचार करून मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी साठी बोकड- बकरे कापू नये व पुढील दोन दिवसात बकरी ईद साजरा करून अल्लाला कुर्बानी द्यावी म्हणजे हिंदू धर्मीयांच्या पवित्र भावनांचा आदर होईल व नंतर ईद पण आनंदाने साजरी होईल हे निश्चित, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे.
चौकट...
आम्हाला मुनसब भाईंचा अभिमान वाटतो......।
मुनसब शेख हे आमच्या गावचे एक वेगळेच व्यक्तिमत्व असून आषाढी वारी असो किंवा प्रत्येक महिन्याची एकादशी असो वा इतर कोणताही सणवार असो मुनसब भाई आमचे बरोबरच असतात, आम्ही त्यांना परके कधीच मानत नाही ते आमच्यापैकीच एक आहेत व आम्हा सर्वांना ते आदरणीय व आपलेसे वाटतात ,त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांचा आम्हा सर्व हिंदू बांधवांना अभिमान वाटतो.
तुकाराम पाटील
दींडीतील वारकरी व सरपंच ,माळेगाव ता.माढा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा