अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळावी....
आ.बबनदादा शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
माढा व करमाळा तालुक्यात 11हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित .......
जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस ..... माढा व करमाळ्यात सर्वाधिक पाऊस.।
****************************************
बेंबळे। प्रतिनिधी
माढा विधानसभा मतदारसंघ व करमाळा विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करून दुःखी व निराजनक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे केली आहे.
या नैसर्गिक संकटाच्या वस्तूस्थिती विषयी आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की 6 ऑक्टोबर 22 ते 14 ऑक्टोबर 22 पर्यंत अतिवृष्टी, ढगफुटीसदृश्य व सर्व दूर झालेल्या पावसामुळे माढा विधानसभा व करमाळा विधानसभा मतदारसंघात 11 हजार हेक्टर (अंदाजे 27 हजार 550 एकर) क्षेत्रातील सर्व प्रकारच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे .या पिकांमध्ये मका उडीद सोयाबीन भुईमूग तूर मूग द्राक्ष केळी डाळिंब पपई ऊस टोमॅटो चारावैरण व इतर पालेभाज्यांची पिके अशा सर्वांचे पूर्ण नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे .याचप्रमाणे अनेक ठिकाणी शेतातील मोठ्या ताली, रस्ते ,बंधारे वाहून गेले आहेत, जमिनीला पाणी लागले असून नुकतीच उगवण झालेली ज्वारी मका अशी रब्बी पिके जागेवर नासून गेली आहेत ,अती पाण्यामुळे जमिनीत चिबड्या बनल्याआहेत .
आतापर्यंतच्या एकुण पर्जन्यमानाविषयी आमदार बबनदादांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की 7 जून ते 14 ऑक्टोबर पर्यंत माढा तालुक्यात 517 मिलिमीटर तर सध्या 615 मिलिमीटर, विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यात सरासरी 538 मिलिमीटर व सध्या 574 मिलिमीटर तर माळशिरस तालुक्यात 473 मिलिमीटर सध्या 556 मिलिमीटर व याच प्रमाणे करमाळा विधानसभा मतदारसंघात सरासरी 496 मिलिमीटर व सध्या 847 मिलीमीटर असा सरासरी पेक्षाही सर्वाधिक पाऊस झालेला आहे.
जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने वाढीव मदत जाहीर केली आहे व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळाली देखील आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून माढा व करमाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पाऊस झालेला आहे.
आपल्या निवेदनात आमदार बबनदादा शिंदे यांनी पुढे नमूद केले आहे की अतिवृष्टीमुळे भीमा व सीना नद्यांना महापूर आले व नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे, विद्युत मोटारींचे पाईपलाईन आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तर पाण्याच्या वेगामुळे जमिनी वाहून गेल्या आहेत . या संपूर्ण नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे होऊन निराश, हवालदील, काळजी युक्त व दुःखी झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा