बेंबळे ग्रामदैवत श्री विमलेश्वराच्या यात्रेस प्रारंभ...
बेंबळे। मुकुंद रामदासी
फोटो..देवाचा, व कावडीचा
बेंबळे येथील जागृत ग्रामदैवत श्री विमलेश्वराच्या चार दिवसीय यात्रेस गुरुवारी दिनांक 30 मार्च रामनवमीपासून प्रारंभ होत असून सोमवारी 3 एप्रिल रोजी सांगता होणार आहे .
बेंबळे नगरीस पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे, गावाच्या पश्चिमेस भीमा नदीचे विशाल पात्र आहे. नदीचेपात्र दक्षिणमुखी वाहिनीचे असल्यामुळे या ठिकाणास अनन्यसाधारण पौराणिक महत्त्व आहे. भगवान शंकरांनी या नदी प्रवाहात स्नान करून आपल्या जटा सात ठिकाणी आपटल्या व या प्रत्येक ठिकाणी एक लिंग तयार झाले आहे म्हणून बेंबळे नगरीस सात साऱ्यांची पांढर म्हणून ओळखले जाते. धारेश्वर, काळेश्वर, उत्तरेश्वर ,सिद्धेश्वर ,बनेश्वर ,आमरेश्वर आणि गावच्या मध्यभागी विमलेश्वर अशी महादेवाची गावच्या सभोवताली मंदिरे आहेत. द्रौपदीसह पांडवांनी येथील नदीकाठी वास्तव केलेल्या खुणा आजही दिसून येतात. संत कुर्मदास महाराजांच्या ग्रंथात बेंबळे नगरी विषयी पौराणिक महत्त्वाचा उल्लेख आजही दिसून येतो. विमलेश्वराच्या यात्रेस 900 वर्षाची जुनी परंपरा असून 35 ते 40 फूट उंची असलेली महादेवाची कावड काठी अतिशय प्रसिद्ध आहे. पुरातन काळातील दोन तांब्याचे मोठे हंडे बांधलेली ही कावड काठी अनेक रेशमी वस्त्रांनी सजवलेली असते. गुरुवारी दिनांक 30 मार्च रामनवमी दिवशी दुपारी विमलेश्वराची कावड काठी श्रीक्षेत्र शिंगणापूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवते .
या काठी बरोबर बैलगाड्या ,ट्रॅक्टर व शेकडो युवक पायी चालत निघालेले असतात. वाद्यांच्या गजरात निघालेली ही कावड काठी खांद्यावरूनच नेली आणि आणली जाते. शुक्रवारी 31 मार्च रोजी सकाळी नातेपुते येथील महादेवाला अभिषेक घालून सायंकाळपर्यंत घाटाची चढण चढून ही काठी शिंगणापूरला पोहोचते. शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी एकादशीच्या पहाटे चार वाजता तांब्याचे हांडे पाण्याने भरून घेऊन मंदिराच्या मोठ्या दगडी पायऱ्यांची चढण चढून शंभू महादेवाच्या मंदिरात कावड काठी आणली जाते ,या ठिकाणी कावडीसह पाच प्रदक्षिणा घालून आणलेल्या पाण्याने शिंगणापूरच्या शंभू महादेवास जलाभिषेक,( धार घालणे) कार्यक्रम संपन्न होतो, या वेळी बेंबळे व पंचक्रोशीतील हजारो नागरिक आवर्जून उपस्थित असतात. यानंतर कावडकाठी माघारी फिरते व पुन्हा पायी चालत बेंबळे येथे सायंकाळपर्यंत भीमा नदीच्या वाळवंटात मुक्कामास येते.
शनिवार दिनांक 1 एप्रिल एकादशीच्या रात्री विमलेश्वर मंदिरात लक्ष्मण -शक्ती- मुक्ती सोहळा रात्रभर चालू असतो व पहाटे आरती नंतर प्रसादाचे वाटप केले जाते. रामायण वाचन व लक्ष्मण शक्तीचे हे 69 वे वर्ष असून हे येथील अध्यात्मिक वैशिष्ट्य आहे. रविवारी द्वादशीच्या दिवशी 2 एप्रिल रोजी सकाळी विमलेश्वरास महाअभिषेक केला जातो, दुपारी शिंगणापूरहून आणलेल्या कावड काठ्यांची भव्य मिरवणूक निघते, सायंकाळी मंदिरात अनेक भाविक पेढे नारळ व प्रसादाचे( शेरनी) वाटप करतात, गावात या दिवशी घराघरातून मोठा सण साजरा केला जातो. रात्री बारा वाजता सजवलेल्या पालखी मधून श्री विमलेश्वराचा छबिना काढला जातो , यावेळी बँड ,ढोल, ताशे वाद्यांचा गजर व दारू कामाची मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते, किमान आठ ते दहा हजार नागरिक या छबिन्यामध्ये सामील झालेले असतात, पहाटे पाच वाजेपर्यंत छबिना मिरवणूक चालू असते. सोमवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी भेदिक पोवाड्याचा कार्यक्रम व दुपारी तीन वाजता जंगी कुस्त्याचा आखाडा भरवला जातो ,मागील तीन महिन्यात नवीन कुस्ती आखाडा तयार करण्यात आलेला आहे. या कुस्तीसाठी सोलापूर ,मोहोळ बार्शी अकलूज सांगोला माळशिरस तसेच इतर भागातून नामवंत पैलवान उपस्थित राहतात, यावेळी हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. या संपूर्ण चार दिवसात विमलेश्वर अन्नछत्र मंडळाच्या वतीने किमान आठ ते दहा हजार भाविकांना अन्नदान केले जाते. कुस्त्यानंतर रात्री विमलेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून या भव्य यात्रेची सांगता करण्यात येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा