महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी बचाव समितीचे उपोषण आंदोलन स्थगित
सात दिवसात मंत्रालयात बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेणार.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
धाराशिव-
जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वर्ग 1 च्या जमिनी वर्ग 2 मध्ये घेतलेल्या जमिनीचे फेर पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सात दिवसात धोरणात्मक निर्णय घेण्याचे समितीला आश्वासित केले. त्यानंतर शेतकर्यांनी सोमवारपासून सुरू केलेले उपोषण दुसर्या दिवशी (दि.28) सायंकाळी स्थगित केले.
धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तहसीलदार गणेश माळी यांनी जिल्ह्यातील वर्ग 1 मधील जमिनीची वर्ग 2 मध्ये नोंद घेऊन सर्वसामान्य शेतकरी व प्लॉटधारकांवर केलेल्या अन्याय केल्याप्रकरणी जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान दुसर्या दिवशी शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष सुधीर पाटील यांच्याशी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. वर्ग दोनच्या जमिनींबाबत मंत्रालयात बैठक घेऊन सात दिवसात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी राज्याचे महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे या प्रकरणात मार्गदर्शन मागविले असल्याचे कळविले आहे. महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर सायंकाळी आंदोलकांनी उपोषण स्थगित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा