बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी देण्यासाठी आदेशित करण्याची मागणी.
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव दि.५ , ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना शासनाकडे नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवकांचे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ते प्रमाणपत्र जोडल्याशिवाय कामगारांची नोंदणी होत नाही. त्यामुळे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आदेशित करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.५ एप्रिल रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कामगारांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी संबंधित ग्रामसेवकाचे ९० दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे ग्रामसेवकांकडे कामगाराने ९० दिवस काम केल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली तर ग्रामसेवक कामगारांना योजना बंद झाली आहे, आम्हाला अधिकार नाहीत अशी कारणे सांगत आहेत. तसेच एखादा ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यास तयार झाला तरी तो अनेक अटी व नियम लावतात. याबाबत गट विकास अधिकारी यांच्याकडे वांरवार तोंडी व लेखी निवेदनाद्वारे मागणी केली. त्यावेळी त्यांनी आम्ही ग्रामसेवकांना सूचना केल्या आहेत. परंतू ते आमचे ऐकत नाहीत असे उत्तर दिले. विशेष म्हणजे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ग्रामीण भागात ग्रामसेवकांनाच आहेत. तर शासनाचा आदेश परिपत्रक (जी.आर.) देखील आहे. मात्र ग्रामसेवक कामगारांना प्रमाणपत्रावर सही देत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार शासनाच्या विविध योजनापासून वंचित राहत आहेत. त्या वंचित बांधकाम कामगारांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यासाठी तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे. यावेळी आ. अभिमन्यू पवार, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव आनंद भालेराव, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प्रवीण पाठक, अशोक बनसोडे,पुष्पकांत माळाळे,अंकुश पेठे,मुन्ना घरबुडवे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा