लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनी धरणातून कालव्यात तातडीने पाणी सोडण्यात यावे....
आमदार बबनदादा शिंदे यांची शासनाकडे रास्त मागणी
कालव्यात ५००ते६०० क्युसेक्स पाणी आले तरी वारकऱ्यांची पाण्याची सोय होईल.......
बेंंबळे।प्रतीनिधी।
पंढरपूरच्या आषाढी वारी निमित्त येणाऱ्या हजारो लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनी धरणाच्या कालव्यातून 500 ते 600 क्युसेक्स पाणी तातडीने सोडण्यात यावे अशी रास्त मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे निवेदन- पत्राद्वारे केली आहे, या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे संपर्क मंत्री यांचे कडे तातडीने मेलद्वारे पाठवण्यात आलेल्या आहेत.
वृत्तांत असा की धुळे, जळगाव,नेवासा, नाशिक, अहमदनगर, शिर्डी तसेच पाटोदा बीड परभणी शनीशिंगणापूर या शहरी व ग्रामीण भागातून शेकडो दिंड्या व त्याबरोबर येणारे हजारो- लाखो वारकरी हे टेंभुर्णी, बेंबळे, परिते, करकंब मार्गे पंढरपूरला जात असतात . वारकऱ्यांना आंघोळ करणे, कपडे धुणे व पिण्यासाठी देखील पाण्याची सतत नितांत आवश्यकताअसते, परंतु यावर्षी जिल्ह्यात कुठेही कसलाच पाऊस नसल्यामुळे व उजनीच्या कालव्यातही पाणी नसल्यामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे व या तीव्र पाणीटंचाईची झळ या भागातून जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना देखील सोसावी लागणार आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 488 .590 मीटर पर्यंत असून धरणाच्या भिंतीतील कालवा दरवाजाची तळपातळी (एमडीडीएल लेवल) 487 मीटर पर्यंत चालू शकते. सध्या कालव्याच्या दरवाज्यावर एक ते सव्वा मीटर उंच दाबाने पाणी आहे, त्यामुळे सध्या कालव्यातून 500 ते 600 क्युसेक्स पाणी चालू शकते असे धरण नियंत्रण विभागाकडून समजते. त्यामुळे तातडीने कालव्यात पाणी सोडल्यास हे पाणी टेंभुर्णी बेंबळे परिते करकंब या भागापर्यंत सहजासहजी जाऊ शकते. अद्याप जिल्ह्यात कोठेही पाऊस नसल्यामुळे पाण्याची सर्वत्र तीव्र टंचाई भासू लागली आहे व येणाऱ्या वारकऱ्यांना देखील या भीषण पाणी टंचाईला तोंड देणे कठीण होणार आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जलसंपदा विभागाने कालव्यातून 17 जूनच्या सकाळ पासून कालव्यात पाणी सोडले जावे अशी रास्त मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे केलेली आहे .
चौकट....
विशेष म्हणजे 21 जून रोजी उजनी धरणातून पंढरपूर आषाढी वारीसाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. नदीत पाणी सोडल्यानंतर कालव्याची पातळी तातडीने कमी होईल, म्हणून 17 जून पासून सकाळी कालव्याचा दरवाज्यातून 500 ते 600 क्युसेक्स पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून या भागातून येणाऱ्या शेकडो दिंड्या व लाखो वारकऱ्यांना या पाण्यामुळे दिलासा मिळेल ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा