वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी ...।
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे ।प्रतिनिधी।
सोलापूर जिल्हा व माढा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे होऊन संबंधितांना तातडीत मदत मिळावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन पत्राद्वारे केली आहे या पत्राच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री व मुख्य सचिव तसेच महसूल सचिव यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या आहेत.
वृत्तांत असा की 4 जून 23 रोजी माढा तालुक्याच्या अनेक भागात वादळी वारे व अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी डाळिंब द्राक्ष पेरू लिंबू नारळ अशा फळबागा व ऊस मका चारावैरण अशी शेकडो एकर पिके भुई सपाट झालेली आहेत व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे .अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेले आहेत,
घरांची पडझड देखील झाली आहे, विजेच्या तारा तुटल्या असून अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत, विद्युत खांब पडल्यामुळे आणि तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन पिण्यासाठी व जनावरासाठी पाणी मिळणे अवघड झालेले आहे, पिठाच्या गिरण्या देखील बंद पडल्या आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी अहवाल दिल झालेला आहे. सध्या बाजारपेठेत कोणत्याच मालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी असंतोष व्यक्त करत असून तीव्र नाराज आहे. मुला मुलींची लग्न, शिक्षण, दवाखाने व दैनंदिन खर्चाने शेतकरी प्रपंच चालवताना मेटाकुटीला आलेला आहे त्यातच पुन्हा या वादळी वारे आणि गारासहित तुफान पावसाचे संकट आल्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे. या सर्व नुकसानीचे युद्ध पातळीवर पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाकडे केलेली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा