गुरसाळे, पट.कुरोली या भीमा नदीकाठची शेतीची वीज सहा ते आठ तास सुरू ठेवा ...
आमदार बबनदादा शिंदे यांची हॉस्पिटल मधून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
बेंबळे। प्रतिनिधी
भीमा नदीवर असलेल्या गुरसाळे, पटवर्धन कुरोली आदी पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्या कडेच्या 12-13 गावातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरींचा वीज पुरवठा सुरळीतपणे आठ तास सुरू करावा अशी मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पत्राद्वारे केली होती, परंतु सुरुवातीस दोन तास व सध्या चार तास शेतीचा वीज पुरवठा चालू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे, हा वीज पुरवठा 6 ते 8 तास सुरू ठेवावा अन्यथा बंधाऱ्यात पुरेसे पाणी असून देखील वीज पुरवठा अभावी कोट्यावधी रुपयाची पिके जळून जाण्याचा धोका निर्माण होत आहे ही वस्तुस्थिती आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
वृत्तांत असा की सोलापूर, पंढरपूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले असता नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत आहे, परंतु माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे, पटवर्धन कुरोली या बंधाऱ्यात चार मीटर पाणी पातळी असून देखील या लाभक्षेत्रातील 12 ते 13 गावातील नदीकाठचा शेती वीज पुरवठा अवघ्या दोन तासावर आणून ठेवला आहे, त्यामुळे हजारो एकरातील पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहे, शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज करून नदीवरून पाईपलाईन करून दोन-दोन, चार-चार किलोमीटर पर्यंत शेतीसाठी पाणी नेले आहे, परंतु वीज पुरवठाच कमी असल्यामुळे कोट्यावधी रुपयाचे गहू ज्वारी मका चारा वैरणीची पिके तसेच डाळिंब केळी द्राक्ष आदी फळबागांची पिके पाण्या अभावी जळून जाऊन कोट्यावधी रुपयाचे नुकसान होण्याच्या भीतीने येथील शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून वीज मंडळाकडे तक्रार केली आहे व निवेदनही दिले आहे, परंतु ही वस्तुस्थिती मागील आठ ते दहा दिवसापासून आमदार बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पत्राद्वारे व प्रत्यक्ष फोनवरून दोन ते तीन वेळा बोलून निदर्शनास आणून दिलेली आहे व नियमीत आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या फक्त चार तास वीज पुरवठा चालू करण्यास मान्यता दिली आहे व यामध्ये वाढ व्हावी व सहा ते आठ तास पुरवठा व्हावा अशी आग्रही मागणी आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे.
हॉस्पिटल मधून जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा....
आमदार बबनदादा शिंदे हे मागील दोन दिवसापासून आपल्या नियमित तपासण्या करून घेण्याच्या निमित्ताने अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल आहेत , या ठिकाणाहून आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी गुरसाळे व पटवर्धन कुरोली या भीमा काठच्या वीज पुरवठ्या विषयी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना दिलेल्या पत्रा विषयी स्मरण करून दिले , सध्या फक्त चार तास वीज पुरवठा सुरू आहे परंतु तो सहा ते आठ तास चालू व्हावा म्हणजे काही प्रमाणात पिकांना पाणी मिळेल अन्यथा बंधाऱ्यात पाणी भरपूर असून देखील कोट्यावधी रुपयांची पिके वीज पुरवठा अभावी जळून जातील ही वस्तुस्थिती आमदार शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सोमवारपासून वीजपुरवठ्यात सुधारणा होईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा