सोलापूर साठी उजनीतून भीमा नदीत पाणी सायंकाळी नऊ वाजता सोडणार .....धीरज साळे
बेंबळेlप्रतिनिधी
सोलापूर शहरासाठी उजनी जलाशयातून भीमा नदी पात्रात सोमवार दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी नऊ वाजता पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे. उजनी धरण ते औंज बंधारा हे 232 km प्रवाहीअंतर पार करून दहा ते अकरा दिवसात पाणी पोहोचणार असून यासाठी साडेपाच ते सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान उजनी जलाशयात सध्या मायनस (-उणे) -18.42 % टक्के पाणी असून जलाशयाची 489.500 मीटर पाणी पातळी आहे तर एकूण 59.53 टीएमसी उपलब्ध पाणीसाठा आहे ,परंतु यामध्ये साधारण 12 टक्के वाळू मिश्रित गाळ आहे.
उजनी धरणाच्या चार गाळ-मोर्यातून सोमवारी पहाटे (11 मार्च ) सुरुवातीला 1500 क्यूसेक्स तर दुपारपर्यंत 2000 क्यूसेक्स व 12 मार्च रोजी 5000 क्यूसेक्स प्रवाहाने पाणी सोडण्यात येणार आहे , उन्हाळ्याची तीव्रता आणि नदी प्रवाहातून होणारे पाण्याचे 'परकोलेशन' (पाझर) लक्षात घेता या पाण्यामध्ये कदाचित वाढ सुद्धा करणे भाग पाडणार आहे अशी माहिती भीमा नगर,धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
कालवा सल्लागार समितीत घेतलेल्या निर्णयानुसार मार्च ते जून या उन्हाळ्यात नदीतून सुटणारे हे पहिले आवर्तन असून 15 मे च्या आसपास दुसरे आवर्तन सोडले जाण्याची शक्यता आहे. सध्याचे पाणी सोलापूर ,पंढरपूर ,सांगोला, मंगळवेढा , आदी शहरे तसेच भीमा नदीकाठची शेकडो गावे ,वाड्या-वस्त्या व पशुधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. या वस्तूस्थितीमुळे 25 मार्च चे दरम्यान उजनी धरणात मायनस (-ऊणे) -28 ते -30 टक्के पर्यंत पाणी पातळी जाणार आहे.
चौकट...
विशेष बाब म्हणजे पाण्याचा प्रवाह वेगाने पुढे जावा म्हणून भीमा नदीकाठावरील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या सर्व विद्युत मोटारींचे कनेक्शन्स तोडले जाणार आहेत व भीमा नदीवर असलेल्या सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची सर्व दारे उघडली जाणार आहेत असे समजते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा