Breaking

रविवार, ७ एप्रिल, २०२४

गळीत हंगाम यशस्वी पार पडल्याबद्दल कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस देणार आ. बबनराव शिंदेविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता.



गळीत हंगाम यशस्वी पार पडल्याबद्दल कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस देणार आ. बबनराव शिंदे


विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता.

टेंभुर्णी प्रतिनिधी धनंजय भोसले.

 येथील गंगामाई नगर पिंपळनेर येथील १८ लाख ९० हजार मे.टन गाळप झालेल्या 
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे संस्थांपक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी संपन्न झाला.

यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना कारखान्याचे चेअरमन आ.बबनराव शिंदे म्हणाले की,या हंगामामध्ये अत्यंत प्रतिकूल स्थिती होती.ऊस कमी आहे असे वाटत होते.मात्र तरीही लांबलेल्या पाऊसामुळे हंगाम चांगला झाला.पिंपळनेर व करकंब या दोन्ही युनिटचे मिळून २५ लाख मे.टनाच्या वर गाळप झाले आहे.यामुळे दोन-तीन वर्षांतील गळीतचे रेकोर्ड मोडले आहे.तरीही एकरी ३६ टनाचे अवरेज मिळाले आहे. भविष्यात एकरी उत्पादन वाढीसाठी शक्य ते प्रयत्न करणार आहोत.शंभर टन उत्पादन घेणारे हि शेतकरी येथे आहेत.माढ्यातील ९२ टक्के ऊस गाळप केला आहे असेही आ.शिंदे म्हणाले.सुरुवातीस यंत्रणा कमी होती.पण नंतर कारखान्याचे काटेकोर नियोजन,पेमेंटची व्यवस्था पाहून यंत्रणा वाढली.पुढील हंगामासाठी १६ हजार ४२५ हे.उसाच्या नोंदी आहेत.तर युनिट दोन कडे चार हजार ९५ नोंदी आहेत.

चेअरमन आ.शिंदे पुढे म्हणाले की,केंद्र शासनाने ज्यूस टू इथेनॉल अचानक बंद केले.यामुळे गळीताचा वेग मंदावला.तीन लाख मे.टन गाळप कमी झाले.कारखान्याने जानेवारी १६ ते ३१ मध्ये ५० रु,फेब्रुवारी शंभर रुपये व मार्च मध्ये दीडशे रुपये जादा पेमेंट दिले आहे.यासाठी १३ कोटी रु.जादा द्यावे लागले.तसेच २७०० प्रमाणे दर दहा दिवसाला शेतकऱ्यास पेमेंट दिले आहे.कारखान्याने आतापर्यंतचे (३१ मार्च) ऊसाचे,वाहतूक व तोडणी बिल अदा केले आहे.युनिट-१ चे ६७७ कोटी तर युनिट दोन १५४ कोटी पेमेंट जमा केले आहे.हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे सर्व अधिकारी वर्ग, सभासद,ऊस पुरवठादार शेतकरी,कामगार,तोडणी मजूर अशा सर्वांची चांगली साथ लाभली आहे.हे सामुदायिक यश आहे.पुढील हंगामात कमी दिवसात जास्त गाळप कसे करता येईल हे घोरण ठेवल्यास टार्गेट पूर्ण करता येईल.

हंगाम यशस्वी पार पडल्याबद्दल कामगारांना एक महिन्याच्या पगार बक्षिस म्हणून देणार.पोळा,दिवाळीस पुढील हप्ता देणार.साखरेचा भाव वाढल्यास कारखान्यास तोटा होणार नाही.मी बोलतो ते तोलतो यात कुठेही तडजोड करीत नाही.
-आ.बबनराव शिंदे

खोडवा संगोपन प्रोग्रॅम
ज्यांचा ऊस जानेवारी ते मार्च दरम्यान गेला आहे.त्यांना वाढीव रक्कम रोख देण्याऐवजी ईफको कंपनीची खते देण्यात येणार आहेत.

प्रथम संचालक लक्ष्मण खूपसे व पांडुरंग घाडगे यांच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे यांनी केले.तर आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनराव उबाळे,जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे,संचालक वेतळा जाधव,रमेश येवले-पाटील,सचिन देशमुख,पोपट गायकवाड,शिवाजी डोके,लाला मोरे,पंचायत समिती सदस्य सुरेश बागल व शहाजी शिंदे,कार्यकरी संचालक संतोष दिग्रजे यांच्यासह अधिकारी वर्ग सभासद,कामगार आदीजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा