*पहाटेच्या दाट पांढ-या धुक्यामुळे पिकांवर विविध रोग पडण्याची भिती*
*अतिवृष्टीतून सावरण्याच्या आधीच शेतकऱ्यांवर ओढावले आणखी एक संकट*
*AJ 24 Taas News Maharashtra*
*माढा / प्रतिनिधी- राजेंद्र गुंड*
माढा तालुक्यातील मानेगाव पंचक्रोशीतील गावांमध्ये बुधवारी व गुरुवारी पहाटेच्या वेळी अतिशय दाट पांढरे धुके पडल्याने शेतातील पिकांवर विविध रोग पडण्याची भिती निर्माण झाली असून अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून सावरण्याच्या आधीच शेतकऱ्यांवर दुसरे एक नैसर्गिक संकट ओढवले आहे त्यामुळे उरलीसुरली पिके सुद्धा वाया जाणार की काय अशी भिती सध्या शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.
मागच्या आठवड्यात झालेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे सुरू आहेत.संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कसलीही मदत मिळाली नाही ही वस्तुस्थिती असताना पांढ-या धुक्यामुळे आणखी एक संकट शेतकऱ्यांचा पाठलाग करीत आहे.यावर्षी शेतकऱ्यांच्या पाठीमागे मार्च महिन्यापासून कोरोना नंतर शेतीमालाचे व दुधाचे घसरलेले बाजारभाव,मागील आठवड्यातील भयानक अतिवृष्टी आणि आता पांढ-या धुक्याचे संकट म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीमागे जणू काही संकटाची भयंकर मालिकाच सुरू आहे मग इतकी संकटे जर शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांवर आली तर तो कसा काय सावरणार ? शेतीसाठी केलेला लाखों रुपयांचे खर्च कोठून भरुन निघणार ? बँकेचे व इतरांकडून घेतलेले कर्ज फेडणार कसे ? इतकी संकटे आल्यावर प्रपंच चालवायचा तरी कसा आणि मग कुटुंबियांना जगवायचे तर कसे? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत.या पांढ-या धुक्याचा दुष्परिणाम कांदा,वांगी,टोमॅटो,तूर, मिरची पिकांवर आणि डाळिंब, सीताफळ,द्राक्ष फळबागांवर करपा,डाऊनी सारखे भयंकर रोग पडून महागडी रासायनिक औषधे फवारणीचा अतिरिक्त आर्थिक भुरदंड शेतक-यांना सहन करावा लागणार आहे.
मानेगाव परिसरातील कापसेवाडी, हटकरवाडी,बुद्रुकवाडी,विठ्ठलवाडी, अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी,खैराव, केवड,कुंभेज,धानोरे,दारफळ, जामगाव,उंदरगाव,लोंढेवाडी, खैरेवाडी,वाकाव,अंजनगाव खेलोबा, वडशिंगे,रिधोरे,तांदूळवाडी, सुलतानपूर,महातपूर,निमगाव, चव्हाणवाडी या भागात पहाटेच्या वेळी पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतक-यांची काळजी वाढली आहे.यावर्षी सुरवातीला समाधानकारक वाटणारा पाऊस शेवटी मात्र शेतक-यांसाठी जणू काही कर्दनकाळ ठरल्याच्या भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.शेतातील पिके व सुपीक जमीन वाहून गेली.सीना नदीच्या काठावरील विद्युत पंप व पाणबुडी मोटारी वाहून गेल्या.आता उरलीसुरली पिकेही जर असेच वारंवार धुके पडले तर बाधित होणार आहेत त्यामुळे शासनाने त्वरित भरीव मदत केली तरच शेतकरी सावरणार आहे अन्यथा उध्दवस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी भिती निर्माण झाली आहे.
बुधवारी व गुरुवारी पहाटेच्या वेळी पडलेल्या दाट पांढ-या धुक्यामुळे विशेषतः कांदा,तूर,मिरची व फळबागांवर मोठा विपरीत परिणाम होणार असून विविध रोग पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतक-यांचा पाय आणखीच खोलात जाऊन अडचणी व समस्या वाढल्या आहेत. या धुक्यामुळे एक प्रकारे रोगट वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतक-यांच्या जीवाला आणखी घोर लागला असून अतिवृष्टीच्या तडाख्यातून काही ठिकाणची उरलीसुरली पिकेही वाया जाऊन गोरगरीब शेतकरी पुरते उध्दवस्त होणार आहेत त्यामुळे शासनाने त्वरित भरीव मदत करावी अशी अपेक्षा विठ्ठलवाडीचे शेतकरी बालाजी गव्हाणे,रामचंद्र भांगे,बबन उबाळे, भिमराव शिंगाडे,सत्यवान गुंड, केवडचे प्रशांत पाटील,राजेंद्र धर्मे, बुद्रुकवाडीचे संदिप पाटील,मानेगावचे दिपक देशमुख,उल्हास राऊत,सुरज पाटील,धानोरेचे विलास देशमुख, दारफळचे अभिजीत शिंदे,शिवाजी बारबोले,कापसेवाडीचे कोंडिबा खोत,कृषीनिष्ठ नितीन कापसे, जामगावचे दिपक गायकवाड, अंजनगाव उमाटेचे लक्ष्मण गुंड, आप्पासाहेब पवार,लोंढेवाडीचे बाबासाहेब लोंढे,रविंद्र कदम यांनी व्यक्त केली आहे.
फोटो ओळी- 1) विठ्ठलवाडी ता.माढा येथे बुधवारी पहाटे पडलेल्या दाट पांढ-या धुक्याचे दृश्य.
ht
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा